Friday, November 27, 2015

असत्यं वचनम् प्रियम्

आटपाट नगरच्या राजवैद्यांना कलियुग चालू आहे हे माहित होते, पण ते आपल्या रुग्णालयातल्या वरिष्ठ वैद्यांवर येव्हढा परिणाम करणारे असेल असे वाटले नव्हते.
"गुरुजी, आज माझा मोठा भ्रमनिरास झाला" राजवैद्य म्हणाले. "मोठ्या हुद्द्यावरच्या व्यक्ती असत्य बोलत असतील असे मला पूर्वी स्वप्नांतही खरे वाटले नसते."
"आपल्या परिचयाची कोणी व्यक्ती असे खोटे बोलली काय?" गुरुजींनी विचारले.
"होय हो. इतर वैद्य या वैद्यांच्या असत्यवचनाबद्दल बोलत असत, पण मला ते कधी खरे वाटले नव्हते. काय झाले, आमचे प्रशिक्षणार्थी निवासी वैद्य संपावर गेले. राजाच्या हुकुमाप्रमाणे असा संप झाला की आम्हा वैद्यांच्या सर्व रजा रद्द होतात. आम्ही संपकर्‍यांना आदेश दिले की संप होणार असे नक्की ठरले की आपापल्या प्रमुख वैद्यांना दूरध्वनी करून तसे क्ळवा. म्हणजे दुसर्‍या दिवशी ते सगळे कामावर येतील आणि रुग्णसेवा करतील. त्याप्रमाणे एक वैद्य सोडून इतर सर्व वैद्य कामावर आले. न आलेल्या वैद्य रजेवर होत्या. त्यांना कळविले का असे विचारल्यावर त्यांचा निवासी वैद्य म्हणाला की त्यांचा दूरध्वनी लागत नाही. या विधानाच्या सत्यतेबद्दल इतरांनी शंका व्यक्त केली म्हणून आम्ही प्रयत्न केला तेव्हा असे लक्षांत आले की दूरध्वनी जुळत होता, पण वैद्य प्रतिसाद देत नव्हत्या. आम्ही त्या निवासी वैद्याला वेगवेगळ्या प्रकारे विचारले तेव्हा निष्पन्न झाले की त्याने दूरध्वनी करून वरिष्ठ वैद्यांना संपाची कल्पना दिली होती व कामावर रुजू होण्याचा निरोपही दिला होता. तेव्हा आपल्याला संपर्क झाला नाही असे तू सर्वांना सांग असे त्यांनी त्याला सांगितले व त्याप्रमाणे त्याने केले. आम्हाला हे समजले आहे हे त्या वैद्य बाईंना नंतर समजले व त्यांनी आम्हाला दूरध्वनी करून आपण त्या गावच्याच नाही असा बहाणा केला अणि संपाबद्दल आत्ताच समजले व आपण लगेच कामावर येतो असे सांगितले. त्या कामावर आल्या तेव्हा सकाळचे काम इतरांनी करून पूर्ण केले होते. खोटे बोलण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी आणखी इतर असत्य वचनेही केली आणि बचावाचा प्रयत्न केला."
"फारच वाईट" गुरुजी म्हणाले.
"ते तर झालेच. पण असे खोटे बोलणे यांत गैर असे काही नाही अशी शिकवण त्या निवासी वैद्याला मिळाली. या वैद्य बाई घरातल्या मुलांवर असेच संस्कार करत असणार असे आम्हाला वाटते आहे. उद्याची पिढी कशी घडते आहे ते बघून आम्हाला भविष्याची चिंता वाटते आहे."
यावर काय बोलायचे ते गुरुजींना सुचले नाही. राजवैद्यांसारखी भीती आता त्यांनाही वाटायला लागली.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क