Thursday, December 31, 2015

दुष्टकर्म्याची कारणमीमांसा

आटपाट नगरच्या राजवैद्यांना राजाने विचारले, "राजवैद्य, आमच्या असे अनुभवास आले आहे की काही काही कुकर्मे वारंवार त्याच प्रकारची कुकर्मे करून सज्जनांना पीडा देत असतात. समुपदेशन, प्रबोधन, शिक्षा यापैकी कशाचाच त्यांच्यावर परिणाम होत नाही. कुत्र्याचे शेपूट नळीत घातलेले असेपर्यंत सरळ रहाते, नंतर ते परत वाकडे ते वाकडेच. हे असे का?"
"महाराज, हा एक मानसिक विकार आहे" राजवैद्य म्हणाले. "या प्रकारच्या माणसांना मानसोपचारतज्ज्ञ सोश्योपॅथ (Sociopath) असे म्हणतात. भविष्यात मुन्नाभाई त्याला केमिकल लोचा असे म्हणेल."
"आपण म्हणता ते नीटसे समजले नाही" राजा म्हणाला.
"हे चित्र पाहिले तर सर्व समजेल" असे म्हणून राजवैद्यांनी मानसशास्त्र शिकविण्यासाठी बनविलेल्या पुस्तकांतील एक चित्र राजाला दाखविले."


"मनांत असणारा सैतान आणि तो कीडा यांच्या संयुक्त विद्यमाने अशा माणसांकडून असे वर्तन घडत असते" राजवैद्य म्हणाले.
राजाला ते चित्र पाहून त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

Tuesday, December 29, 2015

इन्फ्रारे्ड मी

रात्रीच्या अंधारात पहाण्यासाठी सैनिक आणि गुप्तहेर इन्फ्रारेड दुर्बीण वापरता असे मी कादंबर्‍यांत वाचले होते आणि इंग्रजी सिनेमांत पाहिलेही होते. हल्लीच इन्फ्ररेड कॅमेर्‍यावर मला फोटो काढून मिळाला. त्याने मी इतका प्रभावीत झालो, की तो येथे टाकल्याशिवाय मला चैन पडेना. म्हणजे मी त्यांत जास्त देखणा वगैरे दिसतोय अशातली गोष्ट नाही. पण काहीतरी वेगळे म्हणून तो नक्कीच गमतीदार वाटतोय.
इन्फ्रारे्ड मी

Sunday, December 27, 2015

जुळे दैत्य

आटपाट नगरच्या राजवैद्यांना भेटायला त्यांची एक जुनी विद्यार्थिनी आली होती. पदव्युत्तर शिक्षण राजवैद्यांच्या विभागात पूर्ण करून ती आणखी शिकण्यासाठी म्हणून विदेशी गेली होती. आता मायदेशात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ती परतली होती.
"छान. आता तुझ्या प्रगत ज्ञानाचा फायदा जनतेला होईल" राजवैद्य म्हणाले.
"आपला आशीर्वाद असावा म्हणून आले आहे" ती म्हणाली.
"तो तर माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच असतो" राजवैद्य म्हणाले. "तुझ्या बरोबरचे काही विद्यार्थी कधी कधी संपर्क करतात. तुला ते दोघे आठवतात का?" राजवैद्यांनी दोन नावे घेतली.
ती स्तब्ध झाली. चेहर्यावरचे स्मितहास्य लोपले. भ्रुकुटी वक्र झाली.
"काय झाले" राजवैद्य म्हणाले. "त्यांचे नाव घेतल्यावर काहीतरी बिनसलेले दिसते."
"कसं सांगू" ती म्हणाली.
"काय मनांत असेल ते मोकळेपणाने बोल" राजवैद्य म्हणाले. "आता व्रुद्धापकाळ आलाय. आजपर्यंत ऐकले नाही असे आता काही असेल असे वातत नाही."
"ते दोघे मला दोन आणि एक वर्ष ज्येष्ठ होते. दोघे एकत्र असत. त्यांना काहीजण जुळे म्हणत. जन्माने नसले तरी विचाराने आणि वर्तनाने ते जुळे असल्यासारखेच होते."
"माहित आहे. ते इथल्या काड्या तिथे लावणे असा उद्योगही करत असत आणि म्हणून त्यांना काही वैद्य फिस्ट्युला असेही म्हणत असे मी ऐकून होतो."
"त्यांनी मला अभ्यासासाठी आपली खूप मेहेनतीने केलेली टिपणे देऊ केली होती."
"हे तर चांगुलपणाचे क्रुत्य आहे" राजवैद्य म्हणाले.
ती थोडावेल स्तब्ध राहिली. शेवटी मनाचा धडा करून म्हणाली, "त्या मदतीच्या बदल्यात ते माझ्याकडे .... माझ्याकडे.... "
राजवैद्यांचे मन धास्तावले. मुलगी आता काय बोलणार याची त्यांना कल्पना आली आणि तसे नसु देरे देवा असा त्यांनी मनातल्या मनात देवाचा धावा केला.
"... माझ्याकडे स्त्रीसुखाची मागणी केली. मी नकार दिला. पण मनांत त्या घाणेरड्या गोष्टीचा सल राहून गेला आहे."
आता स्तब्ध व्हायची पाळी राजवैद्यांची होती.
"दैत्य!" ते शेवटी म्हणाले. "त्यांतला एक दुर्धर व्याधीमुळे पांगळा झाला आहे, तर दुसरा अजून मोकळा फिरतोय, पण परमेश्वर त्याला योग्य ती शिक्षा करेल. तू मनांतून ही गोष्ट काढून टाक आणि स्वतःचे आयुष्य चांगल्या रितीने जग."
राजवैद्यांना नमस्कार करून ती आपल्या मार्गाने गेली.

Friday, December 25, 2015

ख्रिस्तमसच्या शुभेच्छा (Merry Christmas)


मेरी ख्रिसमस


Merry Christmas


শুভ বড়দিন


क्रिसमस की बधाई


મેરી ક્રિસમસ



ਮੇਰੀ ਕਰਿਸਮਸ

மெர்ரி கிறிஸ்துமஸ்


క్రిస్మస్ శుభాకాంక్షలు


ಮೆರ್ರಿ ಕ್ರಿಸ್ಮಸ್


സന്തോഷകരമായ ക്രിസ്മസ്


joyeux Noël



Fröhliche Weihnachten

Feliz Navidad


счастливого Рождества



Geseënde Kersfees

Wednesday, December 23, 2015

बिन उतार्‍याचे विष

आटपाट नगरचे गुरुजी आणि राजवैद्य शेजारी. संध्याकाळी घटकाभर चार शब्द बोलायचे. अशाच एका संध्याकाळी दोघे बोलत बसले होते.
"गुरुजी, कलियुग आहे हे माहीत आहे. मी तरुण होतो तेव्हाही कलियुगच होते. पण तेव्हा इतकी वाईट परिस्थिती नव्हती हो. आजकाल माणसाच्या नीतीमत्तेवरचा विश्वास उडालाय हो. कोणीही भेटले तरी त्याच्यात चांगुलपणा असेल अशी खात्री देववत नाही."
गुरुजी गप्पच राहिले. त्यांचे अनुभव वेगळ्या चौकटीतले असले तरी अनुमान तेच होते.
"एकवीस वर्षांची मुलगी. लग्न होऊन सात महिने झाले. कूस उजवली म्हणून घरी आणि माहेरी आनंद असायला हवा होता. तिला कोठे ठेवू आणि कोठे नको असे तिच्या पतीला वाटायला हवे होते. गर्भपात करून घ्यायला म्हणून ती पोर आली हो आज. एकटीच आली." पुढे बोलवेना म्हणून राजवैद्य थांबले.
"नवर्‍याला येव्हढ्यात मूल नको वगैरे काही कारण होते का?" गुरुजी म्हणाले. कारण यापेक्षा फार वेगळे असावे असे राजवैद्यांच्या बोलण्यावरून जाणवत होते, पण जिभेवर ते शब्द आणायला गुरुजी कचरत होते. तसे नसेल आणि केवळ बोलल्यामुळे तसे होईल अशी अवास्तव भिती त्यांना वाटत होती.
"नाही हो. सासरच्यांना मूल हवे होते. त्यांना सूनच नको होती."
"का? ती गर्भवती झाली ती काय नको असताना झाली?" गुरुजी म्हणाले.
"ती गोष्ट वेगळी. त्यांना लग्नांत घेतला त्याहून जास्त हुंडा नंतर हवा झाला. त्यावरून तिचा छळ होत होता. तिच्या माहेरची परिस्थिती त्यांच्या वाढत्या मागण्या पुर्‍या करण्यासारखी नव्हती. शेवटी गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊन ठेपली."
"पण त्यांना ते मूल हवे होते ना?" गुरुजी म्हणाले.
"ते तर त्यांना अजूनही हवे आहे. आज घटस्फोट घेऊ. तिची प्रसूती झाली की ते मूल घेऊन जाऊ असे ते म्हणताहेत."
"हं?" गुरुजी म्हणाले.
"पैसेवाले आहेत. ही घाण घरातून गेली की मुलाचे दुसरे लग्न करू म्हणतायत." राजवैद्य म्हणाले. "सोन्यासारखी पोर आहे हो. वडीलही नाहीयेत तिला. आता कोण बघणार बिचारीला? रडत होती बिचारी. आंतडे पिळवटून आले."
"कोतवालाकडे तक्रार केली तर कदाचित मार्ग सापडेल" गुरुजी म्हणाले.
"आणि उद्या तिच्यावर घासलेट ओतून तिला पेटवून दिले तर? किंवा गळा दाबला तर?"
गुरुजी शहारले. त्यांच्याकडे याचे उत्तर नव्हते.
"तरुणपणी अशा गोष्टी ऐकायला मिळत नव्हत्या. आजकाल अशा बर्‍याच गोष्टी होतायत हो. देशाचे काय होणार अशी भिती वाटायला लागली आहे. अशा नरधमांना देव काही शिक्षा करत नाही याचीही भिती वाटते आहे."
"तुम्ही मनाला त्रास करून घेऊ नका राजवैद्य" गुरुजी म्हणाले. "माणसावर संस्कार विद्यार्थीदशेत घडवायचे असतात. तेथे आम्ही शिक्षक कमी पडत असणार. चूक आमची आहे."
"नाही गुरुजी. आपण सर्व प्रयत्न करता हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही केलेले संस्कार माणसे लोभापोटी विसरतात. त्यांच्या आईवडिलांच्या विचारांचा पगडा जास्त ठरतो. सगळेजण मिळून त्या एकट्या अबलेची ससेहोलपट करण्यात वीरश्री मानतात. या विषाला उतारा नाहीये हो."
(Key words: Dowry Harassment)

Monday, December 21, 2015

उत्कर्षाची संधी

आटपाटनगरचे गुरुजी राजवैद्यांना भेटायला गेले तेव्हा एक रुबाबदार गृहस्थ राजवैद्यांबरोबर बोलत होते. गुरुजी तेथे पोहोचत होते तेव्हा ते निघालेच होते. ते गेल्यावर ते कोण होते असे गुरुजींनी कुतूहलाने विचारले.
"शेजारच्या रा्ज्यातले राजवैद्य होते" राजवैद्य म्हणाले. "मागच्या वेळी ते भेटले तेव्हा राजवैद्यांच्या जागेवर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची नेमणूक होऊनही प्रभारी राजवैद्य त्यांना ती जागा देत नव्हते. न्यायाधीशांसमोर खटला चालू होता."
"पण ते प्रभारी ती जागा सोडत का नव्हते?" गुरुजींनी विचारले.
"मोह."
"त्या पदावर वेतन जास्त मिळते का ?" गुरुजींनी विचारले.
"नाही हो" राजवैद्य म्हणाले. "मीही त्यांना तोच प्रश्न विचारला."
"मग काय म्हणाले ते?"
"ते म्हणाले की त्या पदावर असतांना सरकारी खर्चाने किमान दोन-तीन परदेश वार्‍या करायला मिळतात. त्यातून त्यांची दोन मुले अमेरिकेत आहेत. वारी झाली की मुलांना भेटूनही होईल आणि अमेरिका दर्शनही होईल."
"सरकार या कामासाठी राजवैद्यांना परदेशी पाठविते?" गुरुजींनी आश्चर्याने विचारले.
"नाही हो. सरकारी कामाच्या निमित्ताने जायचे आणि मजा करून यायचे." राजवैद्य म्हणाले.
"मग त्यांचे पुढे काय झाले?"
"ते खटला जिंकले. राजवैद्यांची जागा पदरी पडली. तीन वि्देश वार्‍या झाल्या. आता ते संतुष्ट आहेत."
"तुम्हाला अशा वार्‍या करायला मिळत नाहीत ते?" गुरुजींनी विचारले.
"आपल्या रुग्णालयांत तशी पद्धत नाही. आणि मला त्या गोष्टीचा मोहही नाही" राजवैद्य म्हणाले. "मी पारपत्रही (Passport) काढलेले नाही. पारपत्राशिवाय मी कसा परदेशी जाणार? मागे एकदा आमच्या विभागातल्या एका महिला वैद्याला तीन महिन्यांसाठी राजखर्चाने अमेरिकेला जाण्याचा योग आला. जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला आपण उद्या प्रयाण करत आहोत असे सांगितले. आधी समजले तर मी ती संधी बळकावीन अशी त्यांना भिती वाटत होती असे त्या दुसर्‍या एका वैद्यांना म्हणाल्या, ते माझ्या कानावर आले. मला हाताखालच्या वैद्यांनी ओळखलेच नाही या एका गोष्टीचे दुःख अजून मनाला त्रास देते आहे."
"इतर विभागांत तसे झालेले त्यांनी पाहिले असेल" गुरुजी म्हणाले. "किंवा त्यांनी स्वतःवरून तुमची परीक्षा केली असेल. आपण ते मनाला लावून घेऊ नका."
"मनाला लागणार्‍या गोष्टी मला तुमच्यासारख्या सहज थांबविता येत नाहीत हो" राजवैद्य म्हणाले.

Saturday, December 19, 2015

विद्यार्थ्यांसाठी १० आज्ञा (कमांडमेंटस)

आटपाट नगरचे गुरुजी नुकतेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना व्याख्यान देऊन आले होते.
"गुरुजी, आपण असे त्रासलेले का बरे दिसताय?" राजवैद्यांनी विचारले.
"अहो राजवैद्य, काय सांगू? अगदी कहर झाला. शिक्षण राहिले बाजूला. विद्यार्थ्यांच्या वर्तणूकीने अगदी मनस्ताप झाला आहे." असे म्हणून गुरुजींनी त्या व्याख्यानात आलेले विद्यार्थ्यांचे अनुभव राजवैद्यांना सांगितले. ते ऐकून राजवैद्य हसले.
"गुरुजी, ही नवी पिढी आता अशीच वागणार. त्यांना समज द्यायची असेल, तर तुमच्या शिकविण्याच्या वेळी मी देतो त्या दहा सूचना त्यांना स्लाई्ड्स म्हणून दाखवा.
गुरुजींना ही कल्पना फारच आवडली. त्यांनी त्वरेने तशा स्लाई्ड्स बनवून घेतल्या. त्या अशा होत्या.

त्या विद्यार्थ्यांना कितपत आवडल्या आणि मानवल्या कोण जाणे.


SlidesH

Friday, December 18, 2015

दिवसाढवळ्या भेटीला आलेले वटवाघूळ

दिवसाढवळ्या भेटीला आलेल्या वटवाघूळाचा इंटरनेटवरचा हा पहिलाच फोटो आहे आणि कदाचित तो शेवटचाही असेल.


This is the first photo of a bat visiting during broad daylight. It could perhaps be the last one too. It is not in any cage - it is outside a compost cage.

Thursday, December 17, 2015

दीन कर्दनकाळ

 राजवैद्य आणि गुरुजी दरबारी मंडळींच्या वागण्याबद्दल बोलत होते.
"गुरुजी, राजाच्या दरबारातली मंडळी कशी वागतात बघा. प्रधान सचिव दम देतात तेव्हा प्रधान संचालक शेपूट आतमध्ये घालून असतात. आणि आमच्या रुग्णालयतल्या कोणाही बरोबर बोलतात, तेव्हा कर्दनकाळासारखे वागतात."
"माझ्या लक्षांत नाही आले" गुरुजी म्हणाले.
मग राजवैद्यांनी गुरुजींना चित्रावर माऊस धरून दाखविले.
"माऊस चित्रावर धरण्यापूर्वी प्रधान सचिवांबरोबरचे वागणे दिसते आहे, तर माऊस चित्रावर धरल्यावर आमच्या रुग्णालयतल्या म्हणजे त्यांच्या हाताखाल्च्यांबरोबरचे वर्तन दिसते आहे."

ते पाहिले आणि गुरुजी काय समजायचे ते समजले. तुमच्याया लक्षांत आले नसेल तर तुम्हीही चित्रावर माऊस धरा आणि बघा.


When awake
While dream

Tuesday, December 15, 2015

बागेतला पाहुणा

आमच्या सज्जातल्या छोटेखानी बागेबद्दल मी भरभरून लिहित असतो. आज आमच्या बागेतल्या फुलांतला मध पिण्यासाठी येणारा छोटासा पाहुणा मी आपल्याला दाखविणार आहे.


दोन इंच लांबीच्या या फूलचुख्याची शेपूट अर्धा इंच लांब असते. काही जणांचे पोट पांढरे शु्भ्र असते, तर काही जणांचे पिवळे असते. बाकीचे अंग आणि डोके करडे-काळे असते. सगळ्यांची चोच जवळ जवळ पाऊण इंच लांब आणि बारीक असते. हा पक्षी अगदी लाजाळू किंवा भित्रा असतो. फोटो काढण्यासाठी तो एका जागी क्षणभर टिकत नाही.कॅमेरा उचलला किंवा माणसाला आपल्याकडे नुसते बघताना पाहिले तरीही तो पटकन उडून जातो. तो उडतोही अगदी वार्‍याच्या वेगाने. त्याचा फोटो काढणे किती कठीण असते ते वर दाखविलेल्या चार फोटोंवरून सहज लक्षांत यावे. एकाही फोटोत तो पूर्णपणे दिसत नाही आहे. जास्वंद, बोगनवेल अशा कोणत्याही फुलावर तो बसतो, आपली चोच आंत खुपसतो, आणि आंतला मध पितो. त्याच्या येव्हढ्याशा वजनाने ते छोटेसे फूल गदागदा हलते. चिमणीचा आवाज 'चिव चिव' असा असतो. हा फूलचुखा पक्षी दर वेळी 'च्यू च्यू च्यू' असे तीनदा ओरडतो.
(Key words: Honey eater bird)

Sunday, December 13, 2015

सुरक्षित सूर्यस्नान

सूर्यस्नानामुळे ड जीवनसत्व मिळते. अर्थात ते मिळवताना शरीराचे संरक्षण करणे महत्वाचे असते. ऊन फारसे कडक नसताना असे सूर्यस्नान चालण्यासारखे असते.




ऊन कडक झाले तर डोक्यावर टोपी घातली तर डोके तापत नाही, आणि जर डोक्यावर फारसे केस नसतील तर टॅनिंगमुळे तेथील त्वचा काळी पडत नाही.


जर टोपी नसेल तर रुमाल बांधला तरी चालते. त्याने संरक्षण तर मिळतेच, पण घामही पुसला जातो. टोपी धुण्यापेक्षा रुमाल धुणे सोपे असते. रुमाल छान बांधला तर मध्यपूर्वेतील श्रीमंत माणसासारखे रुबाबदारही दिसता येते.


(Key words: Tanning Protection Hat, Hat substitute)

Friday, December 11, 2015

माशाचे श्वसन

Nemo Wagging Tail
पाण्यात पोहोणारे मासे पाहून तणावमुक्ती होते असे म्हणतात. घरात मासे पाळावे असेही त्यासाठी सुचवले जाते. प्रत्येकाला ते जमेलच असे नाही. त्याला पाण्यात श्वासोच्छ्वास करणारा हा मासा हा पर्याय ठरू शकेल.

Wednesday, December 9, 2015

प्रेमाची वेगळीच गोष्ट

आटपाट नगरचे राजवैद्य गुरुजींना एक जुनी आठवण सांगत होते.

ती दोघे आमच्याच बरोबर शिकत होती. वर्गातली इतर मुले अभ्यासात बुडलेली होती तेव्हा तो आणि ती प्रेमात आकंठ बुडालेली होती. खरे तर ते अभ्यासाचे वय होते. त्या परीक्षेत मिळविलेल्या गुणांवर त्यांचे भवितव्य अवलंबून होते. त्याला इंजिनियर व्हायचे होते. तिला कोण व्हायचे होते देव जाणे. मी तिला तसे ओळखत नव्हतो. आम्हा सर्वांना येवढेच माहीत होते की तिला त्याच्याबरोबर सर्व आयुष्य घालवायचे होते. जोडीने संसार करावयाचा होता. आम्ही महविद्यालयाच्या वर्गांत बसायचो तेव्हा ती दोघे समोरच्या उपहारग्रुहात एकमेकांच्या डोळ्यांत बघत बसलेली असत. आम्ही जेव्हा वाचनालयात अभ्यास करत बसायचो तेव्हा ती दोघे महविद्यालयच्या कट्ट्यावर हातांत हात गुंफून बसलेली असायची.  त्यांचे प्रेम त्यांच्या घरच्यांना माहीत होते की नाही कोण जाणे, पण महाविद्यालयांत ते माहीत नव्हते अशी व्यक्ती शोधूनही सापडली नसती हे नक्की. तिचे घर माझ्या घराच्या जवळ होते. त्याचे कोठे तरी दूर होते. मला ती दोघे माझ्या घराजवळ कधी कधी दिसायची. मला पाहून तो हसायचा..
"बायकोला घरी सोडायला आलो" तो म्हणायचा. "पण आडबाजूने आलोय. सासरेबुवांनी बघितले तर राडा होईल."
म्हणजे तिच्या घरी तरी ते माहीत नसावे. पण आपले लग्न होणार हे त्या दोघांना पक्के माहीत असावे. पुढे मी वैद्यकीय शिक्षणाच्या मार्गाने गेलो. तो अभियांत्रिकीच्या शिक्षणाला लागला. ती काय शिकत होती ते समजले नाही. पण आमच्या दृष्टीने ते फारसे महत्वाचे नव्हते. त्यांचे ते पौंगंडावस्थेतले प्रेम पुढे सफळ होणार होते हेच आम्हा सर्वांना आनंददायी वाटत होते.
मध्यंतरी बराच काळ लोटला. आम्ही इतर जण शिक्षण संपवून आपापल्या व्यवसायांत शिरलो. तिच्या घरासमोरून जातांना कधी कधी त्यांचे प्रेम आठवायचे. ती कधीच दिसली नाही, त्या अर्थी ती दोघे लग्न करून आनंदात असणार असे मी समजून चालत असे. एक दिवस एक जुना वर्गमित्र भेटला.
"अरे, तू ऐकलस का? आपला तो कोतवालीत बंद होता. आता बाहेर आलाय." तो आपल्या कथेच्या नायकाबद्दल बोलत होता.
"अरे? हे काय सांगतोयस तू?" मी म्हटले. "काय झाले? ती कोलमडून पडली असेल ना?"
"ती? नाही. तिला हे माहीतही नसेल."
"म्हणजे काय? आपला नवरा कोतवालीत बंद झाला ते तिला माहीत कसे नसेल?"
"तो तिचा नवरा नाहीये काही."
"नाही?" मी सर्द झालो. "असे कसे झाले?"
"परमेश्वराची कृपा. त्याने तिला फसवले. ती सुटली म्हण ना."
"पण ती दोघे किती प्रेमात होती. का फसवले त्याने?"
"आम्ही त्याला विचारले. तो म्हणाला की तिला पटवून दाखवेन अशी त्याने मित्रांबरोबर पैज लावली होती. म्हणून तो तिला फिरवत होता."
"पैजेसाठी दोने तीन वर्षे त्याने प्रेमाचे नाटक केले?"
"होय. त्याने तिला तसे सांगितले तेव्हा ती कोलमडली. जीव देणार होती. घरच्यांनी कशीबशी तिला सावरली. काही वर्षांनंतर तिचे दुसर्‍या एका मुलाबरोबर लग्न लावून दिले. आता ती दुसर्‍या शहरांत रहाते आहे."
"मग तो कोतवालीत बंद कसा झाला?"
"त्याने दुसर्‍या एका मुलीबरोबर लग्न केले. एक मूलही झाले. मग ती दोघे विभक्त झाली. मुलाला आईकडून गुपचूप काढून घेऊन तो गावाला गेला. तिने कोतवालीत मुलाला पळविले म्हणून तक्रार केली आणि कोतवालाने त्याला अटक केली."
"अं..." मला गरगरायला झाले. त्या एका माणसामुळे किती वादळे झाली बघा.

Monday, December 7, 2015

स्वप्ने बघण्याची डिजिटल पद्धत

 स्वप्ने कोणाला नसतात?

आजच्या डिजिटल युगात तर स्वप्ने कंप्युटर, टॅब्लेट, स्मार्ट फोन यावर बघणे अगदीच सोपे झाले आहे. मनांत इमले रचणे आता इतिहासजमा झाले. विश्वास बसत नाही?

या चित्रावर माऊस धरा आणि बघा.


When awake
While dream

Saturday, December 5, 2015

आणखी एक नाटक ((नौटंकी))

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात वैद्य काम करत, प्रशिक्षणार्थी वैद्य शिक्षण घेत, आणि उपलब्ध खाटांहून बर्‍याच जास्त संख्येने रुग्ण कक्षांमध्ये दाखल झालेले असत. अशा वातावरणात नाटक वगैरे गोष्टींना वेळ आणि स्थान मिळण्याची शक्यता जवळजवळ नाही म्हणण्याएवढी होती. पण परमेश्वराची लीला अगाध असते. राजवैद्यांना आलेला हा अनुभव हे त्या सर्वशक्तीमान परमेश्वराच्या अगाध लीलेचे एक उदाहरण.
रुग्णालयात एक कनिष्ठ वैद्य रुजू झाला. आपले काम व्यवस्थित करायचा. कोठे कोठे जरा कमी पडायचा, पण शिकविल्यावर शिकायचा. वागायला बोलायला चांगला होता. पुढे तो बराच वरपर्यंत चढत जाईल अशी राजवैद्यांची धारणा झाली होती. काही इतर वरिष्ठ वैद्य त्यांच्याबरोबर सहमत नव्हते. पण आपले मत बरोबर आहे अशी राजवैद्यांना खात्री होती.
पुढे या वैद्याचे दोनाचे चार हात झाले. आता तो  मार्गाला लागला असे राजवैद्य समजले. पण त्याचा मार्ग वेगळाच होता. वैद्य दर आठवड्याला शनिवारी रजा घ्यायला लागला. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटायला लागले. शनिवारी अर्धा दिवस काम असायचे. एका दिवसाची नैमित्तिक रजा घेऊन अर्ध्या दिवसाची रजा फुकट घालविणारा रुग्णालयाच्या इतिहासातला हा पहिलाच वैद्य होता.
"अरे, तू असे करून स्वतःचे नुकसान का करून घेतोस?" असे त्याला कोणी तरी विचारले.
"माझी प्रिय पत्नी आजारी असते. तिच्यावर उपचार करणारे वैद्य फक्त शनिवारी उपलब्ध असतात" तो वैद्य म्हणाला. "मी तिला एकटीला सोडू शकत नाही. तिचे काही बरेवाईट झाले तर मी तिच्याविना जगू शकणार नाही." असे म्हणताना त्या वैद्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वहात होते. ते अश्रू बघून स्वतः एक वैद्य असणार्‍या आणि एरवी धडधाकट दिसणार्‍या त्याच्या पत्नीला तिच्यावर उपचार करणार्‍या वैद्यांकडे जाण्यासाठी पती बरोबर का लागतो ह विचारायचे कोणाला सुचलेच नाही.
वर्षाला पंधरा नैमित्तिक रजा असत. त्या पंधरा शनिवारांत संपल्या. मग हा वैद्य नियमांविरुद्ध एकेका दिवसाची अर्जित रजा घ्यायला लागला. त्यासाठी त्याने रुग्णालयाच्या प्रमुखांना तीच गोष्ट सांगून त्यांची परवानगी काढली. पुढे पुढे तो महिन्याभराच्या रजा घ्यायला लागला. पत्नीच्या उपचारांसाठी रजा घेतो म्हटल्यावर रजा नाकारणेही शक्य नव्हते. पण एक दिवस निवासी वैद्य संपावर गेले. रुग्णांना आपत्कालीन सेवा देण्यासाठी सर्व वैद्यांच्या रजा रद्द झाल्या. या वैद्यालाही कामावर यावयाचे फर्मान आले. आता त्याने नोकरी सोडण्याची महिन्याची पूर्वसूचना दिली, आणि संपकाळात कामावर येतो असे कबूल केले. पण पठ्ठ्या कामावर आलाच नाही.
"तो कामावर येत नाही. आता संपकाळात रुग्णसेवेसाठी वैद्य कमी पडताहेत" राजवैद्य म्हणाले.
"तो कसला कामावर येतोय?" एक जाणते वैद्य म्हणाले. "गेली दोन वर्षे तो शिकाऊ वैद्यांच्या खाजगी शिकवण्या चोरून करतोय. खूप कमावतोय. म्हणून तर तो दर शनिआरी रजा घेत असे."
"काय सांगताय? आणि त्याच्या पत्नीचे आजारपण आणि त्याचे उपचार?" राजवैद्यांनी विचारले.
"ते एक नाटक हो. आपल्यासारख्या प्रगत राज्यात फक्त शनिवारीच उपचार करणारे वैद्य असतात काय?"
राजवैद्यांना कसेतरी वाटायला लागले. प्रिय व्यक्तीच्या आजारपणाबद्दल किंवा मृत्यूबद्दल उगाच खोटे बोलू नये, परमेश्वर बघत असतो अशी त्यांची धारणा होती. धनाच्या लालसेपायी हा वैद्य हे काय करून बसला असे त्यांच्या मनांत आले. तो अप्रतिम नकला करायचा ते त्यांना आठवले, आणि त्याने घळाघळा रडून दाखविले होते ते कसे त्याचेही कोडे सुटले. असा विश्वासघात करणार्‍या एकामुळे सर्वच मा्णसांवरचा विश्वास उडतो आणि त्यांचे नुकसान होते हेही त्यांना जाणवले. पण जे होते ते तसेच होते आणि त्याला इलाज नव्हता. त्यांना रुग्णालय प्रमुखांनी भर सभेत घळाघळा रडून दाखविले होते ती गोष्टही आठविली. कोणीही यावे आणि आपल्याला फसवून जावे अशा वयाला आपण पोहोचलो की काय अशी शंकाही आली.

Thursday, December 3, 2015

रुग्णालयातले नाटक (नौटंकी)

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयाच्या प्रमुखांनी सर्व प्रमुख वैद्यांची तातडीची सभा बोलाविली. बहुतेक वेळा सभेचा विषय सांगण्यात येत नसे, कारण सभेची पूर्वतयारी करणे आवश्यक असते असे प्रशासनातील कोणालाच वाटत नसावे. या सभेचाही विषय कोणास सांगण्यात आला नव्हता. तरीही हातातली कामे सोडून सर्व प्रमुख वैद्य सभेला हजर झाले. रुग्णालय प्रमुखांचा चेहरा गंभीर दिसत होता. कोणीअकस्मात वैकुंठवासी झाले की काय असे काही जणांच्या मनांत आले.
"आज मी आपणा सर्वांना सभेला बोलावले आहे, त्याचे कारण गंभीर आहे" रुग्णालय प्रमुख म्हणाले. सर्वांनी आपापले चेहरे जमतील तेव्हढे गंभीर केले. रुग्णालय प्रमुखांजवळ बसलेल्यांचे चेहरे आधीपासूनच गंभीर होते. "कोणा एका विक्रुत मनोव्रुत्तीच्या दुष्टाने आपल्याला माझ्याबद्दल एक घाणेरडे पत्र पाठविले आहे, त्याबद्दल मी ही सभा बोलाविली आहे."
चार पाच जण सोडून इतर सर्वांचे चेहरे गोंधळलेले झाले.
"मला पत्र मिळालेले नाही" असे बरेच जण म्हणाले.
"काही विशिष्ट वैद्यांनाच ते पत्र मिळाले आहे" असे एका माहितगाराने सांगितले. आता सर्वांचे चेहरे उत्सुक झाले. पत्रांत असे आहे तरी काय असे त्यांच्या चेहर्‍यांवर दिसत होते.
"माझ्यावर घाणेरडे आरोप केलेले आहेत" रुग्णालय प्रमुख म्हणाले. माझ्या नियुक्तीसाठी मी खोटी प्रमाणपत्रे दिली असे म्हटले आहे. माझी प्रमाणपत्रे खरी आहेत. मी ती कोणालाही दाखवायला तयार आहे."
कोणीही प्रमाणपत्रे बघण्यास मागितली नाहीत. सनसनाटी गोष्ट पुढे असणार याची सर्वांना कल्पना होती.
"आपल्या रुग्णालयांतील काही वरिष्ठ वैद्य स्य्रिया आणि मी यांच्यात घाणेरडे संबंध आहेत असेही पत्रांत म्हटले आहे" रुग्णालय प्रमुख म्हणाले. "इतक्या पवित्र शिक्षक आणि वैद्य भगिनींबद्दल असे म्हणणे इतके किळसवाणे आहे म्हणून सांगू."
काही चेहर्‍यांवर अनभिज्ञता दिसली, तर काही चेहर्‍यांवर बेरकी हास्य उमटले. ते जर रुग्णालय प्रमुखांना दिसले असले तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
"ज्या माणसाने - माणूस कसला, सैतानच तो - हे हीन कृत्य केले आहे, तो कोण आहे ते मला ठाऊक आहे. त्याने असे कृत्य पूर्वीही केले आहे. पण ते जाऊ द्या. आता मी कंटाळलो आहे. नोकरी सोडू्न जावे असे मला आता वाटू लागले आहे. माझ्या पत्नीला ...."
सर्वांनी कान टवकारले. त्यांच्या पत्नीलाही हे पत्र पोहोचले की काय?
"माझ्या पत्नीला दुर्धर आजार झाला होता, तेव्हा माझ्या लक्षांत आले की मी माझ्या सर्वांत जवळच्या व्यक्तीला पुरेसा वेळ दिलेला नाही. आता नोकरी सोडून तिला माझा सर्व वेळ द्यावा असे मला वाटते आहे" असे म्हणून ते स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. ते पाहून उपस्थित स्तिमित झाले. पण एक प्रमुख वैद्य मात्र शांत होते.
"नाटक करतायत ते" असे ते शेजारी बसलेल्या राजवैद्यांना हळूच म्हणाले. "या आधी मी होतो त्या रुग्णालयांझी त्यांनी असेच रडून दाखविले होते. शाळा आणि महविद्यालयांत असतांना ते नाटकांत अप्रतिम काम करत असत आणि ग्लिसरीनशिवाय रडून दाखवत असत."
राजवैद्य सर्द झाले. आपल्याला हाच अनुभव काही काळाने एका कनिष्ठ वैद्याकडून येणार आहे असे त्यांना तेव्हा वाटायचे काही कारण नव्हते. पण ते आपण नंतर बघू.
(Key words: Drama in Hospital)

Tuesday, December 1, 2015

अभ्यास कशासाठी?

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयातील काही वैद्यांची मुलेही वैद्य होण्यासाठी शिक्षण घेत होती.
"राजवैद्य, आम्हा शिक्षकांची मुले काही शिक्षक होऊ पहात नाहीत" गुरुजी म्हणाले. "वैद्यांची मुले मात्र वैद्य होऊ इच्छितात हे कसे?"
"गुरुजी, वैद्यांच्या मुलांना आई-वडिलांचा खूप पैसे कमाविण्याचा उद्योग पुढे चालवायचा असतो. तसे शिक्षकी पेशाचे आहे का?"
"नाही. आपण म्हणता ते खरे" गुरुजी म्हणाले. "मला वाटले, चांगले वैद्य होऊन समाजाची सेवा करावयाची असे त्यांचे स्वप्न असेल."
"स्वप्न असेलही, पण इ्च्छा मात्र दिसत नाही" राजवैद्य म्हणाले. "आमच्या एका वैद्यांची सुपुत्री आमच्याकडेच शिक्षण घेत आहे. तिचा परिक्षेचा अभ्यास आधी वैद्य करतात आणि मग तिच्याकडून करवून घेतात. ती त्यांना काय म्हणाली माहीत आहे? ती म्हणाली, हे तृतीय वर्षाचे शिक्षक नीट परीक्षा घेत नाहीत म्हणून मी वर्षभर अभ्यास केला नाही. ते पुस्तकांत बघून प्रश्नांची उत्तरे लिहू देतात. आता त्यामुळे माझे नुकसान झाले ना?"
'असे?" गुरुजी म्हणाले.
"तर काय. मीही अचंभित झालो. संपूर्ण ज्ञान मिळवून चांगला वैद्य होण्यासाठी अभ्यास करायचा असतो की परीक्षेत चांगले गुण मिळवियासाठी करावयाचा असतो? ज्या वैद्य होण्यासाठी शिकणार्‍या विद्यार्थ्याला हे समजत नाही तो उद्या वैद्य म्हणून काय करणार, हा मोठा चिंतेत टाकणारा प्रश्न आहे बघा."

Sunday, November 29, 2015

कुत्र्याची उपमा

आटपाट नगरच्या राजाने आपल्या रुग्णालयांचा प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून प्रथेप्रमाणे  दरबारातील सर्वात वयोव्रुद्ध व्यक्तीला नेमले होते. या नेमणूकीत ज्ञान किंवा कार्यक्षमता यापेक्षा जास्त सेवाकाळ पदरी असणे आणि राज्यांतील राजाकारण्यांच्या मर्जीत असणे ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या असत. त्यामुळे कूपनलिका खोदणारी (ज्याला आंग्लभाषेत one who drills a borewell असे म्हणतात) व्यक्ती या पदावर विराजमान झाली होती. जरी तिचा वैद्यकशास्त्राशी काडीचाही संबंध नव्हता आणि त्याचे कणभरही ज्ञान नव्हते तरी ही व्यक्ती आपण म्हणजे कोण अशा अविर्भावात वागत असे, आणि अतिशय कुशल व ज्ञानी अशा व्यक्तींवर मोठमोठ्या आवाजांत ओरडून त्यांचा पाणउतारा करत असे. शिक्षणकाळात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याची पात्रता नसल्यामुळे तिला कूपनलिका खोदणे हे काम अंगिकारावे लागले होते. आता प्रथितयश वैद्यांचा पाणउतारा करून ती स्वतःचे श्रेष्ठत्व स्वतःला आणि इतरांना सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असे रुग्णालयांतले लोक न्हणत असत.
त्या दिवशी राजवैद्य रुग्णालयाच्या मार्गिकेतून जात असतांना खालील संंभाषण त्यांच्या कानांवर पडले.
"मी माझ्या बदलीसाठी रुग्णालयाप्रमुखाच्या कार्यालयांत गेले होते. प्रमुख तर कोणत्यातरी पूजेसाठी की उद्घाटनासाठी गेले होते. मग मी त्यांच्या स्वीय सहायकाना भेटले. ते म्हणाले की त्यांच्या हातात काहीच नव्हते. ते प्रमुखांबरोबर आपण होऊन काही बोलायलाही जात नसत कारण ते कुत्रासारखे वागायचे."
"वाईट माणसे कुत्र्याला वागवतात तसे की कुत्रा वागतो तसे?"
"कुत्रा भुंकतो आणि अंगावर येतो तसे".
"अरे अरे. विनाकारण श्वानवंशाची बदनामी केली ना?"
राजवैद्य चपापले. प्रमुखांबद्दल कर्मचारी असे उघडपणे बोलतात तर, आपण बोलतो त्या विषयाचा गंधही नसताना हेच प्रमुख एकदा राजवैद्यांसारख्या ज्ञानी व्यक्तीच्या अंगावरही असेच भुंकले होते ते त्यांना आठवले. त्यानंतर त्यांनीही प्रमुखांना टाळणेच पसंत केले होते.मूर्खाच्या नादी न लागण्यात शहाणपणा असतो हे त्यांना माहीत होते.
"प्रमुख असे वागतात म्हणून सर्व जण कंटाळले आहेत" संभाषण पुढे चालू होते. "त्यांचा सेवानिव्रुत्तीचा दिवस कधी येतो त्याची प्रतीक्षा करत आहेत. कधी कधी तर वाटते की ते काहीतरी होऊन पटकन मरून गेले तर बरे."
राजवैद्यांना हेही नवे होते. कोणाच्या सेवानिवॄत्तीची किंवा मरणाची लोक वाट बघतात हे त्या व्यक्तीला अगदी लांछनास्पद आहे असे त्यांच्या मनात आले. ते दोघे जण त्यानंतर आपल्या मार्गाने गेले, त्यामुळे पुढील संभाषण राजवैद्यांना ऐकू आले नाही. येव्हढ्या लोकांचे शिव्याशाप स्वतःतील कमतरतेमुळे घेण्यापेक्षा मरून जाणे वरे असे त्यांच्या मनांत आले. 

Friday, November 27, 2015

असत्यं वचनम् प्रियम्

आटपाट नगरच्या राजवैद्यांना कलियुग चालू आहे हे माहित होते, पण ते आपल्या रुग्णालयातल्या वरिष्ठ वैद्यांवर येव्हढा परिणाम करणारे असेल असे वाटले नव्हते.
"गुरुजी, आज माझा मोठा भ्रमनिरास झाला" राजवैद्य म्हणाले. "मोठ्या हुद्द्यावरच्या व्यक्ती असत्य बोलत असतील असे मला पूर्वी स्वप्नांतही खरे वाटले नसते."
"आपल्या परिचयाची कोणी व्यक्ती असे खोटे बोलली काय?" गुरुजींनी विचारले.
"होय हो. इतर वैद्य या वैद्यांच्या असत्यवचनाबद्दल बोलत असत, पण मला ते कधी खरे वाटले नव्हते. काय झाले, आमचे प्रशिक्षणार्थी निवासी वैद्य संपावर गेले. राजाच्या हुकुमाप्रमाणे असा संप झाला की आम्हा वैद्यांच्या सर्व रजा रद्द होतात. आम्ही संपकर्‍यांना आदेश दिले की संप होणार असे नक्की ठरले की आपापल्या प्रमुख वैद्यांना दूरध्वनी करून तसे क्ळवा. म्हणजे दुसर्‍या दिवशी ते सगळे कामावर येतील आणि रुग्णसेवा करतील. त्याप्रमाणे एक वैद्य सोडून इतर सर्व वैद्य कामावर आले. न आलेल्या वैद्य रजेवर होत्या. त्यांना कळविले का असे विचारल्यावर त्यांचा निवासी वैद्य म्हणाला की त्यांचा दूरध्वनी लागत नाही. या विधानाच्या सत्यतेबद्दल इतरांनी शंका व्यक्त केली म्हणून आम्ही प्रयत्न केला तेव्हा असे लक्षांत आले की दूरध्वनी जुळत होता, पण वैद्य प्रतिसाद देत नव्हत्या. आम्ही त्या निवासी वैद्याला वेगवेगळ्या प्रकारे विचारले तेव्हा निष्पन्न झाले की त्याने दूरध्वनी करून वरिष्ठ वैद्यांना संपाची कल्पना दिली होती व कामावर रुजू होण्याचा निरोपही दिला होता. तेव्हा आपल्याला संपर्क झाला नाही असे तू सर्वांना सांग असे त्यांनी त्याला सांगितले व त्याप्रमाणे त्याने केले. आम्हाला हे समजले आहे हे त्या वैद्य बाईंना नंतर समजले व त्यांनी आम्हाला दूरध्वनी करून आपण त्या गावच्याच नाही असा बहाणा केला अणि संपाबद्दल आत्ताच समजले व आपण लगेच कामावर येतो असे सांगितले. त्या कामावर आल्या तेव्हा सकाळचे काम इतरांनी करून पूर्ण केले होते. खोटे बोलण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी आणखी इतर असत्य वचनेही केली आणि बचावाचा प्रयत्न केला."
"फारच वाईट" गुरुजी म्हणाले.
"ते तर झालेच. पण असे खोटे बोलणे यांत गैर असे काही नाही अशी शिकवण त्या निवासी वैद्याला मिळाली. या वैद्य बाई घरातल्या मुलांवर असेच संस्कार करत असणार असे आम्हाला वाटते आहे. उद्याची पिढी कशी घडते आहे ते बघून आम्हाला भविष्याची चिंता वाटते आहे."
यावर काय बोलायचे ते गुरुजींना सुचले नाही. राजवैद्यांसारखी भीती आता त्यांनाही वाटायला लागली.

Wednesday, November 25, 2015

वातकुक्कुट




वाचकहो.
मी येथे वातकुक्कुट गोल गोल फिरवले आहे खरे, पण त्या बरोबर माझी छायाचित्रही गोल गोल फिरायला लागली ना. माझी छायाचित्रे स्थिर ठेवून फक्त वातकुक्कुटच कसे फिरवायचे ते माझ्या लक्षात येत नाही आहे. आपल्याला ते कसे करावयाचे ते सुचले तर क्रुपया कळवा. नाहीतरी घटकाभराची करमणूक म्हणून ते तसेच सोडून पुढे जायला हरकत नाही.







(Key words: weather vane, Y-axis rotation, HTML, Javascript)

Monday, November 23, 2015

दुष्काळाचे गणित

"यंदा पाऊस खूपच कमी प्रमाणात झालाय. पाणी जपून वापरायला हवे" आटपाट नगरचे महाराज म्हणाले. "आपण काय कार्यवाही केली?"
"महाराज, वेगवेगळ्या वॉर्डांचा पाणीपुरवठा तीस टक्के कमी केला आहे" अमा्त्य म्हणाले.
"आणि आपल्या रुग्णालयांत काय केले आहे?"
"सर्वांनी पाणी जपून वापरावे म्हणून परिपत्रक काढले आहे."
राजवैद्य शांतपणे सर्व ऐकत होते. सकाळी एका कक्षाच्या प्रमुख परिचारिकेने केलेली तक्रार त्यांना आठवली. 'तीन दिवस झाले. वरच्या मजल्यावरच्या कक्षाच्या स्नानगॄहांतून आमच्या कक्षाबाहेर धो धो पाणी वहात आहे. अभियांत्रिकी विभागाला तीन वेळा पाचारण केले. आत्ता येतो असे म्हणतात पण कोणीही फिरकत नाही.' पिण्यासाठी पाणी नाही म्हणून माणसे देशोधडीला लागली आहेत, आणि येथे बेफिकीरीमुळे किती पाण्याची नासाडी होते आहे, असे त्यांचा मनांत आले. त्यांनी स्वतः अभियांत्रिकी विभागात दूरध्वनी केला. पण उपयोग झाला की नाही ते मात्र त्या जगन्नियंत्यालाच ठाऊक. समोरच्या इमारतीतून पंप लावून हजारो लिटर पाणी गेले दोन दिवस उपसून बाहेर टाकत होते तेही त्यांना आठवले. ते दूरध्वनी करून कोणाला कळवायचे ते माहीत नसल्यामुळे  ते गप्पच राहिले होते. शेवटी तिसर्‍या दिवशी ते थांबले.


विषय निघाला त्यावरून राजवैद्यांना पूर्वीच्या एका दुष्काळाची आठवण आली आणि मनाची खपली निघाली. कर्करोग झाला त्याच्या उपचारांसाठी त्यांची काकी अकस्मात त्यांच्या घरी काकांसह आली होती. महिनाभर मुक्काम ठोकून, बरी होऊन परत गेली होती. काकी म्हणून राजवैद्यांनी सर्व काही केले होते. पु्नःतपासणीसाठी दोघे परत आले तेव्हा शहरात पाऊस सुरूच होत नव्हता. नक्षत्रे कोरडी जात होती. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. काका-काकी राजवैद्यांच्या घरीच मुक्काम ठोकून होते. 'आता पाऊस आला नाही तर आम्ही सर्व जण पाण्यासाठी गावाला तुमच्या धरी येतो' असे राजवैद्यांच्या मातोश्री काका-काकींना सहज म्हणाल्या. क्षणभरही विचार न करता काकी म्हणाल्या, 'पाणी आम्ही देऊ, पण धान्य वगैरे तुम्ही भरा हो'. हक्काने आपल्या घरी येऊन, महिन्यामागून महिने आपल्याच खर्चात काढून, आपलेच सर्व काही फुकट वापरून, वर काकींनी असे म्हणावे हे राजवैद्यांच्या जिव्हारी लागले. पाण्यासाठी कोणीही गावाला गेले नाही. कालांतराने काका-काकी वयोपरत्वे वारले. पण पाऊस पडला नाही की राजवैद्यांची जुनी जखम परत भळभळ वाहू लागे.
(Key words: Drought, water wastage)

Saturday, November 21, 2015

जोडलेली मने

गुरुजींचा एक जुना मित्र त्यांना खूप दिवसांनी भेटला. क्षेमकुशल विचारून झाले. घरच्यांची विचारपूस करून झाली. कामकाजासंबंधी चौकशी करून झाली. मित्र गुरुजींना भेटून आनंदला होता खरा, पण पूर्वीसारखा आनंदी वाटत नव्हता.
"मित्रा, तुझ्या मनाला काहीतरी त्रास होतो आहे" गुरुजी म्हणाले. "आपल्या विद्यार्थीदशेत होतास तसा आता तू आनंदी वाटत नाहीयेस."
"काय सांगू रे" मित्र म्हणाला. "बोलून काही फायदा होईल असे वाटत नाही."
"प्रयत्न तर करून पहा" गुरुजी म्हणाले.
"कामाच्या मागे वेळ कसा जातो समजत नाही. पैसा खूप कमावला, पण माणसे पूर्वीसारखी जोडलेली रहात नाहीत."
"अरे, तो जीवनाचा नियमच आहे. तरीपण लोकांबरोबर जोडलेले रहाण्यासाठी तू काय काय केलेस ते तर सांग."
"मोबाईल फोन आले तेव्हा नोकिआ कंपनीची जाहिरात पाहिली. 'Nokia, connecting people'. हातांत गुंफलेला हात होता त्या जाहिरातीत. पटकन जाऊन एक फोन घेऊन आलो."
"मग प्रश्न सुटला असेल?" गुरुजी म्हणाले.
"छे रे! ईमेल वापरायचो. त्यानेही काही फरक पडला नाही. संपर्कात बरेच जण होते. पण काहीबाही एकीकडून आलेले इतरांना फॉर्वर्ड करणे या पलिकडे काही होईना. मग स्मार्ट फोन आले. ते व्हॉट्सऍप माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे असे परिचीत म्हणाले. झाले. जाऊन एक स्मार्ट फोन घेऊन आलो. व्हॉट्सऍप घातले. पूर्वी फॉरवर्ड केलेल्या ईमेल्स यायच्या त्यांची जागा कालापव्यय करणार्‍या चुटक्यांनी, गोष्टींनी, व्हिडियो क्लिप्सनी घेतली. माणसे काही जोडलेली राहीनात. आता मी काय करू सांग."
"बाबारे, एकमेकांना ईमेल आणि मेसेज करून कालापव्यय केल्यामुळे माणसे जोडलेली रहात नाहीत. संपर्काची साधने कोणतीही असोत, जर मने जुळलेली नसतील तर काही उपयोग नसतो. एकमेकांच्या आनंदाच्या प्रसंगी आनंद व्यक्त करणे, दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करणे, अडीअडचणीला धावून जाणे, स्वार्थीपणे न वागणे यामुळे मने जुळतात आणि जुळलेली रहातात बघ."
मित्राने असे काही पूर्वी ऐकले नव्हते. आजच्या काळांत मोठे झालेल्या त्याच्या मुलाबाळांना तर या गोष्टीची कल्पना असण्याचे काही कारणच नव्हते. मनाशी काही निर्धार करून मित्र उठला, आणि म्हणाला, "मित्रा, तो पहिला मोबाईल फोन खरेदी करण्यापूर्वी तू भेटला असतास तर किती बरे झाले असते."

Thursday, November 19, 2015

पायघोळ अडचण

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात शल्यक्रियागृहात प्रवेश करण्यापूर्वी आपले कपडे बदलून स्वच्छ हिरव्या रंगाचे सुती कपडे घालावे लागत असत. सदरा आणि पायजमा असा तो पेहेराव असे. जंतूसंसर्ग होण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून हा नियम केला होता. कपडे रुग्णालय पुरवीत असे. ते रुग्णालयाचा धोबी धुवून देत असे. छोटे, मध्यम, मोठे असे भिन्न आकाराचे कपडे शिवण्याची तेथे पद्धत नव्हती. त्यामुळे माणूस कोणत्याही आकाराचा असो, त्याला मध्यम आकाराचे कपडे वापरावे लागत असत. स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी भिन्न आकाराचे किंवा प्रकारचे कपडे नसत. नाहीतरी तोंडाला शल्यक्रियेचे मास्क लावले की पुरुष आणि स्त्री यांतला फरक कोठे समजत असे? छोट्या चणीच्या स्त्रियांना यामुळे एक त्रास होत असे. सदरा जरा लांब झाला किंवा त्याच्या बह्या कोपराखाली उतरल्या म्हणून काही फारसे बिघडत नसे. पण पायजम्याचे पाय पावलांच्या खालीपर्यंत पोहोचले की ते चालताना पायांत येत आणि अडखळून पडायला होत असे. खाली दाखविलेल्या छायाचित्रात ही गोष्ट स्पष्ट दिसते.


शल्यक्रियागृहात कधीकधी धावपळ करावी लागे. अशा वेळी पायांत पायजमा अडकून पडण्याचे प्रमाण जास्त असे. दुचाकी चालविताना तुमानीचे पाय चेनमध्ये अडकू नये म्हणून त्यांना लावायला क्लिपा वापरत असत. आटपाट नगरात त्या क्लिपा मिळत की नाही कोण जाणे. दुसरा सोपा उपाय म्हणजे पायजम्याचा पाय खोटेभोवती गुंडाळून त्यावर चिकटपट्टी लावणे. पण ते छान दिसत नाही म्हणून म्हणा की त्यामुळे उकडते म्हणून म्हणा, स्त्रिया तसेही करत नसत. अगदी पुनःपुन्हा पडायले झाले तरीही.
(Key words: Operation theater dress)

Tuesday, November 17, 2015

शल्यक्रियागृहात मेजवानी

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयातील शल्यक्रियागृहात काम खूप असायचे. शल्यतज्ज्ञ तिथे आलटून पालटून कामावर असले तरी  भूलतज्ज्ञवैद्य मात्तिरथे रोजच काम करायचे. त्यांना जेवायला जायला वेळ मिळणे शक्यच नसायचे. मग बिचारे मुदपाकखान्यातून जेवण मागवायचे. ते आले तरी लगेच जेवता येईल याची शाश्वती नसायची. चालू असलेली शल्यक्रिया संपून रुग्ण शुद्धीवर आला की ते जेवायला पोहोचायचे. तोपर्यंत जर झाकण ठेवलेले नसले तर ते अ्न्न उघडेच असायचे. झाकण असलेच तर ते बहुधा आदल्या दिवसाच्या वर्तमानपत्राचे असायचे. जेथे ते जेवायचे ती खोली शल्यक्रियाग्रुहाचे भांडार होते. कपाटाच्या मागे उंदराचे बीळ होते. उंदीर धीट होता. दिवसाढवळ्या तो बाहेर यायला घाबरत नसे. एके दिवशी दुपारी राजवैद्य तेथून जात होते तर त्यांच्या नजरेला काय आक्रीतच पडले.


जेवण ठेवले होते त्या मेजाच्या पायावरून एक छोटासा उंदीर वर चढला आणि त्या जेवणाचा आस्वाद घेऊ लागला.
"ए, शू!" असे म्हणून राजवैद्यांनी उंदराला हाकलले. मग त्यांनी ज्याचे ते जेवण होते त्या भूलतज्ज्ञवैद्याच्या कानावर ही गोष्ट घातली. बिचार्‍याने तोंड वाकडे केले आणि म्हणाला, "जाऊ द्या. आज नशीबात जेवण नाही असे दिसते."
येव्हढे सगळे होईपर्यंत उंदीर परत आला आणि परत मेजावर चढून जेवायला लागला. आता त्याला हाकलून काही फायदा होणार नव्हता. राजवैद्यांनी त्याला निवांतपणे जेवू दिले, आणि त्याचे छायाचित्र काढून घेऊन संग्रही ठेवले. त्यांच्या एका कनिष्ठ वैद्याने ते पुढे फेसबूक की ट्विटरवर टाकले.

Sunday, November 15, 2015

दीपावलीत अंधार

दीपोत्सव चांगला चार दिवस चालला. चांगला झाला की नाही ही गोष्ट वेगळी. खरं तर लोकसंख्या येव्हढी वाढलेली आहे, की कितीही जनजाग्रुती केली आणि त्यामुळे फटाके लावणाऱ्यांचे प्रमाण कितीही कमी झाले तरीही फटाके लावणऱ्यांची संख्या गत वर्षांपेक्षा बरीच जास्त असायला हवी होती. ती तेव्हढी नव्हती, आणि ते जनजाग्रुतीमुळे घडले असे वर्तमानपत्रवाल्यांचे मत पडले. संख्याशास्त्र आणि ठोस पुरावा यांचा अशा बातम्यांशी फारसा संबंध नसतो असे म्हणतात. तेव्हा ही कारणमीमांसा खरी की खोटी हे ठरवण्यासाठी आपण या फोटोकडे पाहूया.


भाऊबीजेच्या दिवशी काढलेला हा फोटो किती घरांमध्ये दिवे आणि आकाशकंदील दिसत होते ते दर्शवितो. सर्वत्र हीच परिस्थिती होती, त्यामुळे एकच फोटो दाखविणे पुरेसे आहे. या इमारतीतील बारा घरांपैकी अवघ्या तीन घरांत दीपावलीची रोषणाई दिसते आहे. ऐन दीपावलीत १२ पैकी ९ घरांत अंधार आणि खाली एटीएम् आणि दुकानांत लखलखाट हे चित्र पुरेसे बोलके आहे. महागाईने कंबरडे मोडलेली इतकी कुटुंबे दीपावली अंधारात काढावी लागते या दुःखात असताना आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना अपराधी वाटून त्यांचा आनंद कमी तर झाला नसेल ना?
(Keywords: Diwali dark)

Friday, November 13, 2015

सात जणी

दिवाळीचा पाडवा होता. 'मुंबई पुणे मुंबई २' चा पहिलाच शो होता. त्या सात मुली बाल्कनीच्या मागून दुसऱ्या रांगेत येऊन बसल्या. दहावी बारावीत शिकत असाव्यात. जाहिराती आणि इतर सिनेमांची ट्रेलर चालू होती तेव्हा त्यांची चिवचिव आणि एकमेकींच्या फिरक्या घेणं चालू होतं. पण सिनेमा सुरू झाला आणि सगळ्या एकदम गप्प झाल्या.  नायक आणि नायिकेचं लग्न ठरलं होतं. बोलणी वगैरे झाली होती. प्रेमविवाह होता. त्यामुळे प्रेम तर होतच. नायक स्वप्नील जोशी - चॉकलेट हिरो. त्याच्या छोट्याछोट्या गंमतीदार संवादांना त्या उस्फूर्तपणे एकसुरांत दाद देत होत्या. त्याच्या प्रेमाच्या संवादांवर उस्फूर्तपणे एकसुरांत उसासे टाकत होत्या. मध्ये एकदा नायिका आणि तिच्या आईचा सीन होता. नायिका अस्वस्थ होती. आईवडिलांचं घर सोडून परक्या घरांत जायचं म्हणून तिला एक अनामिक भिती पण वाटत होती. आईचं लहानपणापासूनचं प्रेम आठवत होतं. 'लग्न झाल्यावरपण आई तू मला पहिल्यासारखीच मेसेज करत रहात हां, म्हणजे बरोबर तू आहेस असं वाटेल आणि धीर येईल, करशील ना?' असं ती आईला म्हणाली. ती माउली मुलगी सासरी जाणार म्हणून आधीच व्याकूळ झाली होती. मुलीचं बोलणं ऐकून तिचा बांध फुटला. इथे सात जणींचाही बांध फुटला. उद्या कधीतरी त्या अशाच सासरी जाणार होत्या, त्या आजच आई वडिलांना सोडून निघाल्यासारख्या रडल्या. आपल्या आया अशाच रडतील म्हणून कासावीस झाल्या. त्यांच्या आयांना घरी पत्ता नव्हता असेल की आपल्या पोरींच्या ह्रुदयांत काय कालवाकालव होत असेल. त्या आपापल्या घरी जाऊन यांतलं काहीच सांगणार नव्हत्या हे नक्की. त्यांच्या अईवडिलांना ती वेळ आल्यावर ते घडलं की कळलंच असतं. पण मागच्या रांगेत बसलेल्या एका वयस्क ग्रुहस्थाला ते कळलं. त्याच्या पत्नीने डोळ्यांना रुमाल लावलाच होता. तिला स्वतःच्या लग्नाची वेळ आठवली असेल. आपल्याला मुलगी असती तर तीही अशीच आपल्या नकळत स्वतःच्या भविष्याच्या विचारांत रडली असती या विचाराने त्या ग्रुहस्थाचं पित्याचं ह्रुदय व्याकूळ झालं. चष्मा काढून त्याने रुमालाने डोळे पुसले. कसं कोण जाणे, त्याच्या पुढे बसलेल्या मुलीला काहीतरी जाणवलं. इंटर्वल झालं होतं. मंद दिवे लागले होते. तिने मागे वळून पाहिलं. त्या ग्रुहस्थाच्या चेहऱ्यावरचे कष्टी भाव बघितले. काय ते समजली आणि आपल्या लग्नाच्या वेळी आपला पिता असाच व्याकूळ होईल असं वाटून परत समोर बघायला लागली. मैत्रीणींची नजर चुकवून तिने परत डोळ्यांना रुमाल लावला.

Wednesday, November 11, 2015

क्रुतीशीलता

"गुरुजी, नवे वारे वाहू लागले आहेत हो" आटपाटनगरच्या राजाच्या रुग्णालयांतील राजवैद्यांनी जाहीर केले. "आमचे जुने ठोकताळे आता बहुधा मागे पडणार."
गुरुजी राजवैद्यांना चांगले ओळखत होते. ते जरा तिरकस बोलत आहेत हे त्यांच्या लगेच लक्षांत आले.
"ते कसे काय?" गुरुजींनी विचारले.
"पूर्वीसारखे र्वैद्यकशास्त्र आले की झाले असे हल्ली उरले नाही. नव्या दमाचे वैद्य आणि जुन्या दमाचे पण केस काळे केलेले वैद्य व्यवस्थापन वगैरेच्या कार्यशाळा करून येतात. क्रुतीशीलता (ज्याला management मध्ये proactivity असे म्हणतात) वगैरे मुळे रुग्णांवर उपचार अधिक कुशलतेने करता येतात असे ते म्हणतात."
"म्हणजे काय ते नीटसे कळले नाही" गुरुजी म्हणाले.
"गुरुजी, क्रुतीशीलता म्हणजे पुढे काय होणार याचा विचार करून आधीच योग्य ती पावले उचलणे. अतिशय योग्य अशी संकल्पना आहे ती. आता आमच्या क्रुतीशील वैद्यांनी काय केले ते पहा. आमच्या एका रुग्णाला आंतडे अडकण्याचा विकार झाला होता. ती दोन महिन्यांची गर्भार पण होती. शल्यक्रिया करून तिचे आंतडे सोडवावे अशी विनंती आम्ही शल्यक्रिया करणाऱ्या वैद्यांना केली. पण त्यांनी कार्यवाहीत विलंब केला. तिला जंतूसंसर्ग झाला. रक्तांत दोष निर्माण झाला आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबली (ज्याला disseminated intravascular coagulation किंवा DIC असे म्हणतात). पोटात गर्भाचा म्रुत्यू झाला तरीही हा विकार होऊ शकतो. पण तिला तो विकार आधी झाला आणि नंतर तिच्या गर्भाचा म्रुत्यू झाला. कालांतराने तिची शल्यक्रिया झाली पण ती दगावली. माताम्रुत्यू अन्वेषणाच्या वेळी शल्यक्रिया करणऱ्या वैद्यांनी असा मुद्दा माडला की गर्भाच्या म्रुत्यूमुळे तिला तो रक्ताचा विकार झाला. आणि त्यामुळे ती दगावली."
"यांत क्रुतीशीलता कोठे आली? उलट निष्क्रियता दिसून आली" गुरुजी म्हणाले.
"गर्भ म्रुत झाल्यावर पांच आठवड्यांनी हा रक्ताचा विकार होतो. या रुग्णामध्ये आता गर्भ मरेल अशी परिस्थिती आली आणि शल्यक्रिया करणारे वैद्य क्रुतीशील असल्यामुळे हा रक्ताचा विकार आधीच झाला. निदान असे त्यांच्या म्हणण्यावरून वाटते. हे क्रुतीशीलतेचे उदाहरण असावे" राजवैद्य म्हणाले. "मी भरल्या बैठकीत तसे सर्वांसमोर म्हणालो देखील."
"मग ते काय म्हणाले?"
"काही नाही. गप्प बसले."
(Keywords: proactivity in medicine)

Monday, November 9, 2015

दीपावलीच्या शुभेच्छा

दीपावलीच्या शुभेच्छा



Saturday, November 7, 2015

श्रद्धास्थान

आटपाट नगरचे राजवैद्य आणि गुरुजी संध्याकाळी निवांत बसले होते. राजवैद्य गप्प गप्पच होते.
"काय राजवैद्य, आज गप्पसे? काही विपरित तर घडले नाही ना?" गुरुजींनी विचारले.
"नाही. जुनी आठवण आली. तेव्हाची श्रद्धास्थाने आज डळमळीत वाटायला लागली म्हणून मन उदास झालेय."
"कशाबद्दल म्हणताय तुम्ही?" गुरुजींनी विचारले.
"माझ्या विद्यार्थीदशेतली गोष्ट आहे. शल्यक्रियाशास्त्राचे आमचे प्राध्यापक होते. त्यांचे व्यक्तीमत्व आम्हाला उत्तुंग वाटायचे. त्यांचा आदर्श नजरेपुढे ठेवून भविष्याकडे वाटचाल करावी असे वाटायचे. त्या काळच्या दोन घटना आठवल्या. एकदा सायंकाळी आपत्कालीन शल्याक्रियाग्रुहांत ते एका रुग्णाचे अपेंडिक्स काढणार होते. सामान्यपणे हे काम कनिष्ठ वैद्य करत असत. प्राध्यापकांकडून ते  शिकायला मिळणार म्हणून मी तेथे गेलो होतो. शल्यक्रिया सुरू करण्यापूर्वी त्यांनी मला एका बाजूला बोलावले आणि हलक्या आवाजांत म्हणाले 'आता मी जे अपेंडिक्स काढणार आहे ते खरे तर तीव्र अपेंडिसायटिस झाले म्हणून काढत नाहीये. आपल्या एका वैद्यांचा खाजगी रुग्ण आहे, त्यांनी विनंती केली म्हणून काढतो आहे. तर ते निरोगी दिसते आहे असे मोठ्याने म्हणू नकोस,' मी तत्काळ नाही असे म्हटले आणि माझा शब्द पाळला.. तेव्हा मला त्यांत गैर काय ते काही समजले नाही. नंतर एकदा मी त्यांना एका रुग्णाच्या जखमेची मलमपट्टी स्वतः करताना पाहिले. प्राध्यापक स्वतः हे काम कधी करत नाहीत तर शिकाऊ वैद्यांना करायला सांगतात हे मला माहीत होते. त्यांना मी परत कधीही कोणाची मलमपट्टी करताना पाहिले नाही."
"यामुळे आपण आज व्यथित का झाला आहात?" गुरुजींनी विचारले.
"आज मला एकदम जाणवले की खाजगी व्यवसाय करण्यास राजाची परवानगी नसताना त्यांनी आपले खाजगी रुग्ण राजाच्या रुग्णालयांत आणले आणि त्यांच्यावर उपचार केले, ज्याचे पैसे त्यांनी रुग्णालयाबाहेर घेतले असावे. माझ्याकडे या गोष्टीचा काही पुरावा नाही. पण आज खुले आम काय चालले आहे ते पाहता माझा अंदाज खरा असावा असे वातते.. विद्यार्थ्यांसमोर असा आदर्श ठेवणारे वैद्य एकेकाळी आमचे श्रद्धास्थान होते याचा आज विषाद वाटतोय."

Thursday, November 5, 2015

मशरूम - नवी जात

आमच्या बाल्कनीतल्या बागेत नव्या गोष्टी घडत असतात. त्यांत मशरूमच्या नव्या जातीची भर पडली आहे. एक दिवस अकस्मात आम्हाला मातीत तरारून आलेले मशरूम दिसले.


 या छायाचित्रात पफबॉल सारखे पांढ~या रंगाचे तीन मशरूम दिसत आहेत. त्यांतील एक पूर्ण वाढलेले आहे.


या छायाचित्रात पफबॉल सारखे पांढ~या रंगाचे एक मशरूम दिसत आहे.


पहिल्या छायाचित्रात दिसणारे मशरूम या छायाचित्रात उजवीकडे खालच्या भागात दिसत आहे. वरच्या भागात डावीकडे सहा-सात पट लांबलेले आणि सपाट झालेले त्याचे खोड आणि त्याच्या टोकाला आलेले फूल दिसत आहे.


टेपवर्मसारखे दिसणारे लांबच लांब खोड आणि त्याच्या टोकाला मशरूमचे फूल दिसत आहे.


या छायाचित्रात फुले झालेले दोन मशरूम दिसत आहेत.

इतर मशरूमपेक्षा आमच्या घरी उगवलेले मशरूम वेगळे आहे. पूर्ण वाढलेले मशरूम साधारणपणे तसेच रहाते. आमच्या मशरूमचे खोड सहा-सात पट लांब झाले आणि टेपसारखे सपाट झाले. त्याच्या टोकाला पाकळ्या असणारे फूल आले. असे आजपर्यंत झालेले ऐकिवात नाही आणि गूगलवर शोध करूनही सापडले नाही.
(Keywords: mushroom, flat stem, lengthening of stem, flower)

Tuesday, November 3, 2015

सहा आणि आठ पाकळ्यांचे जास्वंद

साधारणपणे जास्वंदाच्या फुलाला पाच पाकळ्या असतात. आमच्या गॅलरीतल्या बागेत आलेल्या नेहमीपेक्षा वेगळ्या जास्वंदाच्या फुलांबद्दल आणि जास्वंदाच्या खोडावर आलेल्या मुळांबद्दल मी यापूर्वी लिहिले आहे. जर आपण ते वाचू इच्छिता, तर ती पोस्टस् खालील संकेतस्थळांवर उपलब्द्ध आहेत.

  1. चार पाकळ्यांचे जास्वंद
  2. एका झाडावर दोन प्रकारची जास्वंदाची फुले
  3. एका झाडावर विविध प्रकारची जास्वंदाची फुले
  4. जास्वंदाच्या खोडावर मुळे

आज मंगळवार - श्री गणपतीबाप्पांचा वार. त्यांचे आवडते फूल जास्वंद. आज आमच्या घरच्या बागेत सहा पाकळ्यांची जास्वंदाची दोन फुले आली, तर आठ पाकळ्यांचे एक फूल आले. त्यांची छायाचित्रे खाली दाखविली आहेत.


सहा पाकळ्यांचे जास्वंदाचे फूल.


आठ पाकळ्यांचे जास्वंदाचे फूल.

आठ पाकळ्यांच्या जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्या असमतोल पद्धतीने आल्या आहेत. त्यांतल्या पाच पाकळ्या पुढे आहेत, तर तीन मागे आहेत. सहा आणि आठ पाकळ्यांची फुले का आली याबद्दल मला काही म्हणायचे नाही - कारण मी वनस्पतीशास्त्रज्ज्ञ नाही, आणि अशास्त्रीय कारणे मला द्यायची नाहीत. पण गूगलवर शोधली असता अशी फुले सापडली नाहीत हे नक्की.

२७-१२-२०१७
दहा पाकळ्यांचे जास्वंद

पावणेतीन वर्षांनंतर मी हे जुने पोस्ट एडिट करतोय. आज आमच्या घरी दहा पाकळ्यांचे जास्वंद फुलले. पाच अतिरिक्त पाकळ्या नेहमीच्या पाकळ्यांच्या खालच्या बाजूने दिसत आहेत (बाणांनी दर्शवलेले). ज्याला सेपल म्हणतात, ते हिरवे असतात. या फुलांत ते पाकळ्यांसारखे (पेटल) बनले आहेत.


(Key words: Hibiscus with four petals, Hibiscus with six petals, Hibiscus with eight petals)

Sunday, November 1, 2015

मरायची वेळ

आटपाट नगरांत देवाचा उत्सव सुरू व्हायचा होता. आबालव्रुद्ध उत्साहात आणि आनंदात होते. देवाचे आगमन घरोघरी होणार होते तसेच सार्वजनिक उत्सवांतही व्हायचे होते. तयारी जोरात सुरू होती.
"अहो ऐकलत का? काकी वारल्या" गुरुजी पत्नीला म्हणाले. काकी व्रुद्ध होत्या. कधीतरी देवाघरी जाणारच होत्या. तरीही आपले माणूस गेले की दुःख हे होतेच.
"कधी हो?" गुरुजींच्या पत्नीने विचारले.
"काल अर्ध्या रात्री गेल्या. आताच दूरध्वनी आला."
"वाईट झाले" गुरुजींची पत्नी म्हणाली.
गुरुजींनी काकींच्या मुलाबाळांचे सांत्वन केले. मग रोजची कामे. दिवस हां हां म्हणता सरला.
दुस~या दिवसाची पहाट झाली आणि गुरुजींचा दूरध्वनी खणखणला. येव्हढ्या पहाटे कधी कोणी त्यांना दूरध्वनी करत नसे. त्यांच्या ह्रुदयांत चर्र झाले.
"गुरुजी, काकींचा पुतण्या वारला,"
गुरुजी सुन्न झाले. काकींचे वय झाले होते तसे पुतण्याचे झाले नव्हते.
"बरे झाले बोललात" गुरुजी म्हणाले. "अकस्मात गेला! काकी गेल्या म्हणून हाय खाऊन गेला की काय?"
"नाही हो" पलीकडून उत्तर आले. "बरा होता. उत्सवाच्या तयारीत मग्न होता. काकी गेल्याचे समजले तेव्हा चिडून म्हणाला देखील की काकींना जायला हीच वेळ मिळाली? आता आपल्याला देव पूजता येणार नाही. सगळी तयारी वाया गेली."
"वाईट झाले" गुरुजी म्हणाले. गुरुजी पुढे काही बोलतील म्हणून बातमी देणारा थांबला. पण गुरुजी काहीच बोलले नाहीत. वाट बघून तो बर तर मग असे म्हणाला आणि त्याने दूरध्वनी खाली ठेवला. मनातल्या विचारांच्या कल्लोळात ते गुरुजींच्या लक्षातही आले नाही.

Friday, October 30, 2015

दूरस्थ शिक्षण - प्रतिसाद

आटपाट नगरांत काही काही ठिकाणी दूरस्थ शिक्षण कसे चालायचे ते राजवैद्यांनी गुरुजींना सांगितले त्याबद्दल आपण वाचले असेलच. नसेल तर आपण ते येथे वाचू शकता. ते त्यांच्या एका जुन्या विद्यार्थ्याच्या वाचनात आले. त्याने विदेशातील आपल्या रुग्णालयात जवळ असूनही दूर अशा प्रकारचे दूरस्थ वैद्यकीय शिक्षण विद्यार्थी कसे घेत हे लिहून कळविले आणि सोबत एक फोटोसुद्धा पाठविला. तो त्याच्या परवानगीने येथे दाखविला आहे.




फोटो शल्यक्रियाग्रुहाचा आहे, ज्याला विदेशात ऑपरेशन थिएटर असे म्हणतात. जेथे शल्यक्रिया चालू आहे ते स्थळ बाणाच्या चलतचित्राने दाखविले आहे. ती शल्यक्रिया किती कुतूहलाने आणि उत्सुकतेने विद्यार्थी वैद्य पहात आहेत ते पहा, असे राजवैद्यांच्या जुन्या विद्यार्थ्याने लिहिले होते. ते पाहून कोणा शिक्षकाचा ऊर भरून येणार नाही असे राजवैद्यांच्या मनात आले.

Wednesday, October 28, 2015

ताठ आणि लवचिक कणा

आटपाट नगरच्या राजाच्या प्रशासनात, रुग्णालयांत, विद्यालयांत आणि साधारणपणे सर्वच क्षेत्रांत एक अजब गोष्ट दिसून येत असे. कदाचित तो मनुष्यस्वभावाचा स्थायीभाव असावा आणि आटपाट नगराशी किंवा त्याच्या राजाशी त्याचा काही संबंध नसावा. उदाहरणार्थ रुग्णालयाचे प्रमुख वैद्य हे विविध विभागांच्या प्रमुखांना कधी अनुल्लेखाने मारत असत, तर कधी अनुद्गाराने मारत असत. सर्व रुग्णालयांचे प्रमुख संचालक रुग्णालयांच्या  प्रमुख वैद्यांना कस्पटासमान वागवीत असत. प्रशासनाचे प्रमुख अधिकारी सर्व प्रमुख वैद्य आणि संचालक यांना सभेसाठी बोलावून तासन् तास तिष्ठत ठेवत असत, आणि त्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत असत. या गोष्टी अशाच व्हायच्या असे ग्रुहीत धरूनच रोजचे कामकाज चालत असे.
तर एकदा प्रमुख प्रशासकांच्या छातीत एका पहाटे अकस्मात दुखू लागले. त्यांनी प्रमुख वैद्यांना दूरध्वनी करून आपण रुग्णालयांत पहाटे येतो असे कळविले. प्रमुख वैद्यांनी प्रमुख ह्रुदयरोगतज्ज्ञांना पहाटे आपल्या दालनांत हजर रहा असे फर्मावले. राजवैद्य तेथून आपल्या विभागाकडे चालले होते तेव्हढ्यात प्रमुख प्रशासक आणि प्रमुख वैद्य  त्यांच्या दालनांतून एकत्र बाहेर पडले. प्रमुख ह्रुदयरोगतज्ज्ञ आंग्लदेशांत घालतात तसा 'थ्री पीस सूट' घालून आणि टाय लावून बाहेर उभे होते. त्यांच्या समोरून प्रमुख प्रशासक आणि प्रमुख वैद्य प्रमुख प्रशासकांच्या रथांत जाऊन बसले. 'ह्रुदयरोगविभागांत या' असा त्यांना आदेश देऊन रथ त्यांना पाठी ठेवून निघून गेला.  राजवैद्य हा प्रसंग अचंभित होऊन पहात उभे होते. रथांत भरपूर जागा असूनही आणि  ह्रुदयरोगतज्ज्ञांशिवाय उपचार सुरू होणार नाहीत याची पूर्ण कल्पना असूनही त्यांना बरोबर घेतले नाही, यामुळे अपमानित झालेल्या ह्रुदयरोगतज्ज्ञांनी राजवैद्यांकडे पाहिले, त्यांची नजर चुकविली आणि प्रमुख प्रशासकांना तपासण्यासठी आपल्या विभागाकदे चालत चालत निघाले.
का लांतराने राज्यातल्या खूप उपद्रवमूल्य असणा~या एका राजकारणी नेत्याने प्रमुख प्रशासक, प्रमुख संचालक,  सर्व  प्रमुख वैद्य आणि सर्व विभागांच्या प्रमुखांना सभेसाठी बोलावले. सभेच्या वेळी मोठे भाषण केले. नेहमीच्या सवयीप्रमाणे  प्रमुख संचालक प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडू लागले तेव्हा त्याने प्रथम त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले, नंतर त्यांचा जुन्या चुका उद्ध्रुत केल्या, आणि शेवटी प्रमुख संचालक मध्ये मध्ये बोलायचे थांबेनात असे पाहिल्यावर 'मी भाषण करत असताना मध्ये मध्ये बोलू नका' असे स्पष्त सांगितले. सर्वांचा वारंवार आणि ब~याच वेळा अकारण अपमान करणा~या प्रमुख संचालकांचा अपमान त्यांच्या हाताखालच्या सर्वांनी पाहिला, आणि तो त्यांनी सस्मित मुद्रेने गिळला हेही पाहिले.
"वारा येईल तसा पाठीचा कणा ताठ आणि लवचिक कसा होतो पहा" असे कोणा वैद्याने म्हटलेले राजवैद्यांनी ऐकले.

Monday, October 26, 2015

पटपट वाचायला शिकविण्याची पद्धत







आटपाट नगरांत राजाच्या विद्यालयातले गुरुजी शिक्षणक्षेत्रात नवनवे प्रयोग करत असत.

विद्यार्थ्यांना भरभर वाचण्याची सवय लागावी म्हणून त्यांनी एक नवी युक्ती काढली.

छापील मजकूर मिळाला तर विद्यार्थी वाचताना चालढकल करतात. पण वाक्य छापले जात असताना वाचले नाही तर ते पुसले जाईल असे कळले की ते पटपट वाचतील

हे सूत्र मनाशी धरून त्यांनी काय केले पहा.

लक्ष इथे तिथे गेले की शिक्षण हातातून निसटते पहा.




प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क