Tuesday, September 8, 2015

सामूहिक आजार

आटपाट नगरातली गोष्ट आहे.
"राजवैद्य, आपल्याला साथीचे आजार माहित आहेत. पण आपण सामूहिक आजारांबद्दल ऐकले आहे का?" गुरुजींनी विचारले.
"नाही बुवा" राजवैद्य म्हणाले. "हे आपले एखादे कोडे असावे असे वाटते."
"आमचे विद्याथी म्हणजे तरूण मुलगे आणि मुली असतात. तारुण्याची ताकद आणि उत्साह त्यांच्या अंगात सळसळत असतो. आजारपण म्हणजे काय ते त्यांना माहीतच नसावे असे त्यांच्याकडे बघून वाटते. गेल्या आठवड्यांत एके दिवशी त्यांना सामूहीक आजार झाला."
म्हणजे नक्की काय झाले?" राजवैद्यांनी विचारले
"सकाळच्या सत्रांत सर्व विद्यार्थी अनुपस्थित राहिले. मी ते येतील म्हणून वाट बघत होतो. शिकविण्याची तयारी केली होती. सर्व फुकट गेले. दुस~या दिवशी त्यांतले अर्धे जण आले. ब~याच कालावधीनंतर आणखी थोडे जण आले. काल आपण का आला नव्हता असे मी प्रत्येकाला विचारले. प्रत्येकाने आपली तब्येत ठीक नव्हती असे उत्तर दिले. चेह~यावरून तर त्यांच्यापैकी कोणीही आजारी किंवा नुकताच आजारांतून उठलेला वाटत नव्हता. एका दिवशी सर्वांना होणारा आणि दुस~या दिवशी बरा होणारा कोणता आजार असेल बरे?" गुरुजींनी विचारले.
राजवैद्य हंसले. "असा आजार नसतो गुरुजी" ते म्हणाले. "कोणाचा तरी वाढदिवस असेल किंवा दुस~या विषयाची परीक्षा असेल. आमचे प्रशिक्षणार्थी वैद्यही असे करतात."
"आपण विद्यार्थी होतो तेव्हा असे होत नव्हते" गुरुजी म्हणाले.
"काळ बदललाय गुरुजी. जे झालेय ते बरे की वाईट हा विचार सोडून द्या. झालेय ते बदलता येणार नाही याची खूणगाठ बांधूनच चला."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क