Showing posts with label मानसशास्त्र. Show all posts
Showing posts with label मानसशास्त्र. Show all posts

Tuesday, January 12, 2016

दांडीची भविष्यवाणी

आटपाट नगरच्या राजवैद्यांना एक जुनी आठवण आली आणि ते स्वतःशीच हंसले.
"काय राजवैद्य, कोणाची आटवण आली?" गुरुजींनी मिश्किलपणे विचारले.
"तुम्हाला वाटतेय तसे काहीही नाही" राजवैद्य म्हणाले. "म्हातारपणी थट्टा करता काय माझी?"
"छे छे! मी पण म्हाताराच. मी काय थट्टा करणार तुमची? असे स्वतःशीच हंसलात म्हणून विचारले" गुरुजी म्हणाले.
"मी पदव्युत्तर शिक्षण घेत होतो तेव्हाची गोष्ट आहे. मी हात वाचून भविष्य कसे सांगायचे ते शिकत होतो. ते आमच्या बरोवरच्यांना समजले. सगळ्यांनी आपापले हात भविष्य वाचा म्हणून माझ्यापुढे केले."
"मुलींचे हात हातांत घेण्यासाठी ही एक नामी युक्ती आहे असे म्हणतात" गुरुजी म्हणाले.
"गुरुजी, आज आपण आमच्यावर कसले संशय घेता आहात?" राजवैद्य म्हणाले.
"छे छे! मी तुमच्याबद्दल बोलत नव्हतो. मी आपले एक सर्वसाधारण विधान केले."
"मी एक एक करून तिघा जणांचे हात पाहिले. त्यांना दीर्घायुष्य, संपत्ती, यश, संततीसुख वगैरे गोष्टी मिळतील असे दडपून दिले. ते खूष झाले. मग एका मुलीने हात पुढे केला."
गुरुजी्नी मंदसे स्मित केले. राजवैद्यांनी तिकडे दुर्लक्ष केले.
"ती अभ्यास करत नसे. या संधीचा फायदा घेऊन तिला अभ्यास करण्यास प्रवृत्त करता येईल असे मला वाटले. मी तिचा हात पाहिला. हातात घेऊन नाही हो" गुरुजींकडे नजर टाकून राजवैद्य म्हणाले. "माझे दोन्ही हात पाठीमागे धरून मी दुरूनच तिचा हात पाहिला. इतक्या वर्षांनी तुम्ही माझ्या नीतीमत्तेबद्दल संशय घ्याल हे मला माहित होते."
गुरुजीनी परत स्मित केले.
"तू अभ्यास केला नाहीस तर परीक्षेत तुझी दांडी जाईल" असे मी तिला सांगितले." राजवैद्य म्हणाले.
"बास? येव्हढेच?"
"हो. येव्हढेच" राजवैद्य म्हणाले.
"मग काय झाले?" गुरुजींनी विचारले.
"कालांतराने तिची परीक्षा झाली. ती नापास झाली. मी असे भविष्य सांगितले म्हणून ती नापास झाली असे ती चार जणांना म्हणाली. मला वाटते मी 'अभ्यास नाही केला तर' असे म्हटले होते ते तिला ऐकू गेले नसावे, समजले नसावे, किंवा त्याचे तिला विस्मरण झाले असावे. किंवा नापास होण्याचे कारण ती स्वतः नसून इतर काहीतरी किंवा कोणीतरी असावे असे तिला सिद्ध करावयाचे असावे."
"मग आपण यातून काय शिकलात?" गुरुजींनी विचारले.
"कोणाचे भले करण्यासाटी सुद्धा कधीही भविष्य सांगायचे नाही" राजवैद्य म्हणाले.

Monday, November 23, 2015

दुष्काळाचे गणित

"यंदा पाऊस खूपच कमी प्रमाणात झालाय. पाणी जपून वापरायला हवे" आटपाट नगरचे महाराज म्हणाले. "आपण काय कार्यवाही केली?"
"महाराज, वेगवेगळ्या वॉर्डांचा पाणीपुरवठा तीस टक्के कमी केला आहे" अमा्त्य म्हणाले.
"आणि आपल्या रुग्णालयांत काय केले आहे?"
"सर्वांनी पाणी जपून वापरावे म्हणून परिपत्रक काढले आहे."
राजवैद्य शांतपणे सर्व ऐकत होते. सकाळी एका कक्षाच्या प्रमुख परिचारिकेने केलेली तक्रार त्यांना आठवली. 'तीन दिवस झाले. वरच्या मजल्यावरच्या कक्षाच्या स्नानगॄहांतून आमच्या कक्षाबाहेर धो धो पाणी वहात आहे. अभियांत्रिकी विभागाला तीन वेळा पाचारण केले. आत्ता येतो असे म्हणतात पण कोणीही फिरकत नाही.' पिण्यासाठी पाणी नाही म्हणून माणसे देशोधडीला लागली आहेत, आणि येथे बेफिकीरीमुळे किती पाण्याची नासाडी होते आहे, असे त्यांचा मनांत आले. त्यांनी स्वतः अभियांत्रिकी विभागात दूरध्वनी केला. पण उपयोग झाला की नाही ते मात्र त्या जगन्नियंत्यालाच ठाऊक. समोरच्या इमारतीतून पंप लावून हजारो लिटर पाणी गेले दोन दिवस उपसून बाहेर टाकत होते तेही त्यांना आठवले. ते दूरध्वनी करून कोणाला कळवायचे ते माहीत नसल्यामुळे  ते गप्पच राहिले होते. शेवटी तिसर्‍या दिवशी ते थांबले.


विषय निघाला त्यावरून राजवैद्यांना पूर्वीच्या एका दुष्काळाची आठवण आली आणि मनाची खपली निघाली. कर्करोग झाला त्याच्या उपचारांसाठी त्यांची काकी अकस्मात त्यांच्या घरी काकांसह आली होती. महिनाभर मुक्काम ठोकून, बरी होऊन परत गेली होती. काकी म्हणून राजवैद्यांनी सर्व काही केले होते. पु्नःतपासणीसाठी दोघे परत आले तेव्हा शहरात पाऊस सुरूच होत नव्हता. नक्षत्रे कोरडी जात होती. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. काका-काकी राजवैद्यांच्या घरीच मुक्काम ठोकून होते. 'आता पाऊस आला नाही तर आम्ही सर्व जण पाण्यासाठी गावाला तुमच्या धरी येतो' असे राजवैद्यांच्या मातोश्री काका-काकींना सहज म्हणाल्या. क्षणभरही विचार न करता काकी म्हणाल्या, 'पाणी आम्ही देऊ, पण धान्य वगैरे तुम्ही भरा हो'. हक्काने आपल्या घरी येऊन, महिन्यामागून महिने आपल्याच खर्चात काढून, आपलेच सर्व काही फुकट वापरून, वर काकींनी असे म्हणावे हे राजवैद्यांच्या जिव्हारी लागले. पाण्यासाठी कोणीही गावाला गेले नाही. कालांतराने काका-काकी वयोपरत्वे वारले. पण पाऊस पडला नाही की राजवैद्यांची जुनी जखम परत भळभळ वाहू लागे.
(Key words: Drought, water wastage)

Wednesday, October 28, 2015

ताठ आणि लवचिक कणा

आटपाट नगरच्या राजाच्या प्रशासनात, रुग्णालयांत, विद्यालयांत आणि साधारणपणे सर्वच क्षेत्रांत एक अजब गोष्ट दिसून येत असे. कदाचित तो मनुष्यस्वभावाचा स्थायीभाव असावा आणि आटपाट नगराशी किंवा त्याच्या राजाशी त्याचा काही संबंध नसावा. उदाहरणार्थ रुग्णालयाचे प्रमुख वैद्य हे विविध विभागांच्या प्रमुखांना कधी अनुल्लेखाने मारत असत, तर कधी अनुद्गाराने मारत असत. सर्व रुग्णालयांचे प्रमुख संचालक रुग्णालयांच्या  प्रमुख वैद्यांना कस्पटासमान वागवीत असत. प्रशासनाचे प्रमुख अधिकारी सर्व प्रमुख वैद्य आणि संचालक यांना सभेसाठी बोलावून तासन् तास तिष्ठत ठेवत असत, आणि त्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत असत. या गोष्टी अशाच व्हायच्या असे ग्रुहीत धरूनच रोजचे कामकाज चालत असे.
तर एकदा प्रमुख प्रशासकांच्या छातीत एका पहाटे अकस्मात दुखू लागले. त्यांनी प्रमुख वैद्यांना दूरध्वनी करून आपण रुग्णालयांत पहाटे येतो असे कळविले. प्रमुख वैद्यांनी प्रमुख ह्रुदयरोगतज्ज्ञांना पहाटे आपल्या दालनांत हजर रहा असे फर्मावले. राजवैद्य तेथून आपल्या विभागाकडे चालले होते तेव्हढ्यात प्रमुख प्रशासक आणि प्रमुख वैद्य  त्यांच्या दालनांतून एकत्र बाहेर पडले. प्रमुख ह्रुदयरोगतज्ज्ञ आंग्लदेशांत घालतात तसा 'थ्री पीस सूट' घालून आणि टाय लावून बाहेर उभे होते. त्यांच्या समोरून प्रमुख प्रशासक आणि प्रमुख वैद्य प्रमुख प्रशासकांच्या रथांत जाऊन बसले. 'ह्रुदयरोगविभागांत या' असा त्यांना आदेश देऊन रथ त्यांना पाठी ठेवून निघून गेला.  राजवैद्य हा प्रसंग अचंभित होऊन पहात उभे होते. रथांत भरपूर जागा असूनही आणि  ह्रुदयरोगतज्ज्ञांशिवाय उपचार सुरू होणार नाहीत याची पूर्ण कल्पना असूनही त्यांना बरोबर घेतले नाही, यामुळे अपमानित झालेल्या ह्रुदयरोगतज्ज्ञांनी राजवैद्यांकडे पाहिले, त्यांची नजर चुकविली आणि प्रमुख प्रशासकांना तपासण्यासठी आपल्या विभागाकदे चालत चालत निघाले.
का लांतराने राज्यातल्या खूप उपद्रवमूल्य असणा~या एका राजकारणी नेत्याने प्रमुख प्रशासक, प्रमुख संचालक,  सर्व  प्रमुख वैद्य आणि सर्व विभागांच्या प्रमुखांना सभेसाठी बोलावले. सभेच्या वेळी मोठे भाषण केले. नेहमीच्या सवयीप्रमाणे  प्रमुख संचालक प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडू लागले तेव्हा त्याने प्रथम त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले, नंतर त्यांचा जुन्या चुका उद्ध्रुत केल्या, आणि शेवटी प्रमुख संचालक मध्ये मध्ये बोलायचे थांबेनात असे पाहिल्यावर 'मी भाषण करत असताना मध्ये मध्ये बोलू नका' असे स्पष्त सांगितले. सर्वांचा वारंवार आणि ब~याच वेळा अकारण अपमान करणा~या प्रमुख संचालकांचा अपमान त्यांच्या हाताखालच्या सर्वांनी पाहिला, आणि तो त्यांनी सस्मित मुद्रेने गिळला हेही पाहिले.
"वारा येईल तसा पाठीचा कणा ताठ आणि लवचिक कसा होतो पहा" असे कोणा वैद्याने म्हटलेले राजवैद्यांनी ऐकले.

Sunday, September 20, 2015

इच्छाश्रवण

इच्छाश्रवण
देवाने श्रवणशक्ती असलेला प्राणी बनविला, तेव्हा जो ध्वनी कानांवर पडेल तो ऐकण्याची शक्ती त्याला दिली. या यंत्रणेत जर दोष निर्माण झाला तर बहिरेपणा येणे, चित्रविचित्र आवाज ऐकू येणे (उदाहरणार्थ टिनिटस) असे श्रवणाचे विकार होऊ लागले. सिझोफ्रेनिया या मानसिक विकारात ध्वनी नसताना ऐकू येणे हे लक्षण दिसते (हॅलुसिनेशन). इतपत माहिटि सर्व वैद्यांना आणि ब~याच सामान्य माणसांनाही असते, जशी ती गुरुजींनाही होती. पण एक घटना अशी घडली की गुरुजी चक्रावले. शेवटी त्यांनी ते राजवैद्यांना विचारले.
"राजवैद्य, आज मोठी विचित्र घटना घडली. आमच्या एका शिक्षिकेच्या वर्गांत एक विद्यार्थिनी आहे. त्या मुलीचे शिक्षणांत लक्ष नाही त्याबद्दल तिच्या पालकांना सांगण्यासाठी बोलावले होते. मुलीची आई आली. तिच्याबरोबर बोलताना त्या शिक्षिकेने म्हटले, की जर मुलीने मन लावून अभ्यास केला नाही तर तिचे नुकसान होईल. तर शाळेत आम्ही प्रयत्न करत आहोतच, पण मुलीच्या आईवडिलांनी घरी तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. त्यावर ती आई उसळून म्हणाली, की मुलीला शाळेतून काढून टाकू असे आपण कसे म्हणता? असे काय केले आहे यिने की तुम्ही तिला शाळेतून का्ढून टाकायला निघालात? आम्ही परोपरीने सांगितले की असे कोणीही म्हटले नाही, पण ती काही ऐकूनच घेईना. आपण आपल्या कानांनी तसे ऐकले असे तिचे पालुपद सुरूच. शेवटी कशीबशी समजूत काढून तिला घरी पाठविले. हे असे का झाले हे काही समजत नाही. तिला मानसिक विकार असावा असे काही वाटत नाही."
"गुरुजी, चूक ना तुम्हा शिक्षकांची, ना त्या विद्यार्थिनीच्या आईची. या प्रकाराला मी इच्छाश्रवण असे म्हणतो. माणुस जेव्हा प्रचंड मानसिक तणावाखाली असतो, तेव्हा कधीकधी त्याला इतर लोक काय म्हणतात ते ऐकू येत नाही, आलेच तर समजत नाही, आणि कधीकधी इच्छाश्रवण होत. म्हणजे जे आपल्याला ऐकावे लागेल ते त्याला ऐकू येते. कधीकधी जे ऐकण्याची त्याची आत्यंतिक इच्छा असते ते त्याला ऐकू येते. या स्त्रीला ज्या गोष्टीची भिती वातत होती ते तिला ऐकू गेले. आमच्याकडे सु्द्धा अलिकडेच अशीच एक रुग्ण आली होती. तिला बराच जंतूसंसर्ग झाला होता. मी तिला म्हटले की आपण औषधोपचारांनीच तुम्हाला बरे करू, शल्यक्रियेची आवश्यकता भासेल असे वातत नाही, आठवड्याभरात तुम्ही ब~या व्हाल. तासाभराने तिचा भाऊ मला भेटायला धावत पळत आला. म्हणाला, आपल्या बहिणीने हाय खाल्ली आहे. ति म्हणतेय की आपण तिला म्हणालात की तू आठवडाभरच जगशील. खरेच का हो ती आठवडाभरच जगेल? मी हतबुद्ध झालो. मी काय म्हटले होते ते मी त्याला समजावून सांगितले. मग तो शांत झाला आणि निघून गेला."
"अशा परिस्थितीत काय करावयाचे?" गुरुजींनी विचारले.
"ही गोष्ट घडून गेल्यावर काहीही करता येत नाही. असा प्रसंग येईल असे आधीच वाटले, तर एखादा त्रयस्थ साक्षीदार उपस्थित ठेवणे उपयुक्त ठरेल. जर सोय असेल तर संभाषण ध्वनीमुद्रित करणे सर्वात चांगले."
"माणसांना असे होऊ नये म्हणून काही करता येणार नाही का?" गुरुजींनी विचारले.
"गुरुजी, जे काही करायचे ते असे होणा~या माणसांनीच करायचे असते. मानसिक संतुलन राखणे आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे या द्वारे असे श्रवण टाळता येईल. पण ते समजून घेतले तर ना!"

Wednesday, September 16, 2015

भिंतीला चार कान

आटपाट नगरच्या गुरुजींचे शेजारी चौकस स्वभावाचे होते. गुरुजींच्या घरी कोणीही आले की शेजारी हजर होत. पाहुणे कोण, कशाला आले आहेत वगैरे चौकशी सहज केल्यासारखी करत आणि मगच आपल्या घरी अात. सुरुवातीला राग आला तरी नंतर गुरुजींना या गोष्टीची सवय झाली.
एक दिवस गुरुजींकडे रात्री साडेअकरा वाजता एक ग्रुहस्थ आले. ते गुरुजींच्या एका पुस्तकाचे प्रकाशक होते. काही जरूरीच्या कामासाठी ते येव्हढ्या  रात्री गुरुजींची परवानगी घेऊन आले होते. गुरुजींनी त्यांना घरात घेतले आणि आवाजामुळे शेजारपाजारच्यांना त्रास नको म्हणून दार बंद केले. पाच दहा मिनिटांत त्यांचे संभाषण आटोपले. गुरुजींनी त्यांना घरी जाण्यासाठी दार उघडून दिले आणि पहातात तर काय, शेजारचे ग्रुहस्थ आणि त्यांची आई गुरुजींच्या दाराजवळ भिंतीला कान लावून उभे होते. आपल्या घरांत काय संभाषण चालले आहे ते माय-लेक चोरून ऐकत आहेत हे गुरुजींच्या लक्षांत आले. आपल्याला गुरुजींनी रंगेहात पकडले हे दोघांच्या लक्षांत आले. तोंडातून अवाक्षर न काढता दोघे वळले आणि आपल्या घरांत जाऊन त्यांनी दार लावून घेतले.
"त्यांना चोरून ऐकायचे होते तर ते दाराबाहेर कशाला आले?" गुरुजी पत्नीला उद्देशून म्हणाले. "आपल्या दोघांच्या घरांमधल्या भिंतीला स्वतःच्या घरांतून कान लावता आले असते."
"अहो, दाराजवळची भिंत एका विटेची आहे. दोघांच्या घरांमधली भिंत दोन विटांची आहे. या लोकांनी प्रयोग करून कोठच्या भिंतीतून आपल्या घरांतले संभाषण ऐकू येते ते पाहून ठेवले असणार. म्हणून पकडले जाण्याचा धोका पत्करून दोघे दाराबाहेरच्या भिंतीला कान लावून उभे राहिले असणार" गुरुजींची पत्नी म्हणाली.
कालांतराने शेजारच्या माणसाची आई व्रुद्धत्वाने वारली. काही वर्षे गेली. एके दिवशी गुरुजींच्या घरी एक परिचीत आले. काही जटील समस्येवर संभाषण सुरू होते. बोलता बोलता आवाज वाढला.
"अहो, शेजारी बाहेर उभे राहून आपल्या घरांतील संंभाषण ऐकत आहेत असे वाटते" गुरुजींची पत्नी म्हणाली.
गुरुजींनी दार उघडून पाहिले. शेजा~याची पत्नी गुरुजींच्या दाराकडे कान करून उभी होती. गुरुजींनी आपल्याला चोरून ऐकताना पकडले हे लक्षांत येताच ती वरमली, जोराने खोटेच हंसली. गुरुजींनी उद्विग्न वाटले. काहीही न बोलता त्यांनी दार लावून घेतले.
"नवरा आणि सासू यांची गादी शेजारीण पुढे चालवतेय असे दिसते" गुरुजी पत्नीला म्हणाले. "अडीअडचणीला कासावीस झाले की आपल्याला रात्री बेरात्री हक्काने बोलावतात आणि स्वतःचे सर्व सुरळीत आहे असे वाटते तेव्हा आमच्या घरांत छिद्रे शोधायला येतात त्यांना लाज कशी वाटत नाही?"
"काय सांगावे?" गुरुजींची पत्नी म्हणाली. "परमेश्वारानेच त्यांनाही घडविले आहे. त्यांच्या अशा वागण्याचे काहीतरी प्रयोजन असेलही."

Sunday, August 30, 2015

शेजारधर्म

आटपाट नगरातली गोष्ट आहे. गुरुजींच्या शेजारपाजारी भली माणसे रहात असत. गोडीगुलाबीने आणि सलोख्याच्या वातावरणात सर्वांचे आयुष्य व्यतीत होत होते. पण उडदामाजी काळे गोरे म्हणतात ना, तसा प्रकार व्हायला लागला.
एके दिवशी प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे गुरुजी सकाळी कामावर गेल्यानंतर तासाभरातच घरी परतले. दाराबाहेर जरा गडबड दिसली. ते थबकले आणि काय चाललेय त्याचा त्यांनी अंदाज घेतला.
"ही शिडी घ्या आणि आमच्या दूरध्वनीची तार बदला" गुरुजींच्या शेजारच्या बाई दूरध्वनी तंत्रज्ञाला सांगत होत्या. त्याने गुरुजींच्या दाराबाहेर ठेवलेली त्यांची शिडी घेतली आणि काम सुरू केले. गुरुजी सर्द झाले. शेजा~यांकडे त्यांची स्वतःची चांगली शिडी होती. असे असतांना त्यांनी स्वतःच्या कामासाठी गुरुजींची शिडी वापरावी हे काही योग्य दिसत नव्हते. काही न बोलता ते आपल्या घरांत शिरले. शेजारच्या बाईंचा चेहरा जरा पडला. सायंकाळी त्यांनी पत्नीला ही गोष्ट सांगितली, तेव्हा ती म्हणाली,
"गेल्या आठवड्यांत त्यांचा दिवा बदलायचा होता, तेव्हापण त्यांनी आपल्याला न सांगता आपली शिडी वापरली होती."
नंतर पावसाळा आला. रविवार असल्यामुळे गुरुजी घरी होते. दारांत उभे राहून काही काम करत होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. तेव्ह्ढ्यात त्यांच्या शेजारच्या बाई आल्या. त्यांची छत्री गळत होती. गुरुजींनी काय असे काय, भिजायला झाले ना, वगैरे म्हटले पण त्या आपल्या घरी काही जाईनात. शेवटी त्यांनी गुरुजींच्या पायाजवळचे 'सुस्वागतम' असे लिहिलेले गुरुजींचे पायपुसणे खस्सकन ओढून घेतले, त्याला पाय पुसले, आणि मग आपल्या घरांत शिरल्या. इतकी वर्षे या बाई आपलेच पायपुसणे वापरत आल्या आहेत हे गुरुजींना तेव्हा समजले.
पोस्टमनने आणलेल्या पत्राची गोष्ट तर कमालीची होती. गुरुजींच्या घरी पोस्टमन दिवसांतून एक फेरी करत असे. त्या दिवशी पोस्टमनने गुरुजींच्या समोरच त्यांच्या पत्रपेटीत त्यांची पत्रे टाकली. गुरुजींनी ती घेतली आणि ते घरांत आले. थोड्या वेळाने त्यांची पत्नी घरी आली आणि तिने पत्रपेटी उघडून पाहिली. आंत एक पत्र मिळाले, ते घेऊन ती घरांत आली.
"अहो, त्या शेजारच्या पलिकडच्या इमारतीत रहाणा~यांचे पत्र आपल्याकडे आले आहे. असे बरेचदा होते. आता ते नेऊन दिले पाहिजे." गुरुजींची पत्नी म्हणाली.
"अग, ते कसे शक्य आहे? मी तासाभरापू्र्वीच सगळी पत्रे घरांत आणली. पोस्टमन परत येणे शक्य नाही."
"अगोबाई, मग आपल्या शेजारणीने ते पत्र तिच्या पेटीत सापडले ते आपल्या पेटीत टाकले की काय?" गुरुजींची पत्नी म्हणाली. गुरुजीना ते खरे असण्याची शक्यता वाटली. खात्री करण्यासाठी म्हणून त्यांनी ते शेजा~यांच्या पेटीत टाकले. दुस~या दिवशी पत्र गुरुजींच्या पेटीत परत हजर झाले.
"बघा कशी आहे ती!" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"जाऊ दे. परमेश्वर बघत असतो" गुरुजी म्हणाले. त्यांनी ते पत्र पोस्टांत नेऊन दिले. यापुढे संभाळून रहायचे असे त्यांनी ठरवले, पण अतर्क्य अशा गोष्टींची कल्पना नसते त्यांच्यापासून संभाळायचे कसे हे काही त्यांच्या लक्षांत येईना.

Monday, August 24, 2015

तसे काही नाही ना?

"राजवैद्य, मला एक कठीण प्रश्न पडला आहे" त्यांचा एक पदव्युत्तर विद्यार्थी म्हणाला. "काही काही रुग्ण मला एक प्रश्न विचारतात, ज्याचा अर्थ मला समजत नाही".
"कोणता प्रश्न?"  राजवैद्यांनी विचारले.
"तसे काही नाही ना?, असे ते विचारतात" विद्यार्थी म्हणाला.
"तसे म्हणजे कसे ते त्यांच्या आघीच्या संभाषणावरून समजायला हवे" राजवैद्य म्हणाले.
"तेच तर! रुग्णाची संपूर्ण तपासणी करून त्याचे निदान आणि उपचार यांची संपूर्ण माहिती दिली की ते हा प्रश्न विचारतात."
"ते निदान कोणते असते?" राजवैद्यांनी विचारले.
"एकच निदान असते असे नाही. कधी ते गर्भाशयाचे फायब्रॉइड असते, तर कधी स्त्री बीज न बनल्यामुळे असणारे वंध्यत्व असते, तर कधी मूत्राशयाचा जंतूसंसर्ग असे असते ."
"दर वेळी त्या प्रश्नाचा अर्थ वेगवेगळा असतो" राजवैद्य हंसून म्हणाले. "जेव्हा निदान गर्भाशयाचे फायब्रॉइड असे असते, तेव्हा त्यांना विचारायचे असते की गर्भाशयाचा कर्करोग तर नाही? जेव्हा ते स्त्री बीज न बनल्यामुळे असणारे वंध्यत्व असे असते, तेव्हा त्यांना विचारायचे असते की यापुढे त्या स्त्रीला गर्भधारणा कधीही होणार नाही असे तर नाही? जेव्हा ते मूत्राशयाचा जंतूसंसर्ग असे असते, तेव्हा त्यांना विचारायचे असते की हल्ली सर्वत्र भिती पसरली आहे तो एड्स हा विकार तर नाही?"
"पण त्यांना तसे स्पष्ट विचारायला काय होते?" विद्यार्थ्याने विचारले.
"त्याचा उच्चार केला तर तोच आजार निघेल अशी अगम्य भिती त्यांच्या मनांत असते. तसे असू नये हे खरे, पण माणसाचे मन ते, त्याला नियम लागू असलेच पाहिजेत असे नाही" राजवैद्य म्हणाले.
"पण त्यांना काय विचारायचे आहे ते मी समजावे कसे?" विद्यार्थ्याने विचारले.
"ते अनुभवाने जमेल" राजवैद्य म्हणाले. "पण नाही समजले तर त्यांना त्यांच्या प्रश्नाचा अर्थ स्पष्टच विचारावा हे बरे."
विद्यार्थी आनंदी झाला आणि आपल्या अर्धवट सोडलेल्या कामाला गेला.

Saturday, August 22, 2015

चेहरा की डोके?

'बालादपि सुभाषितम् ग्राह्यम्' हे गुरुजींना माहित होते. आपल्या विद्यार्थ्यांकडून काही शिकायला मिळाले तर ते आवडीने शिकत असत. आज त्यांच्या ए्का विद्यार्थ्याने त्यांची रथ चालकांची गोष्ट ऐकली आणि त्यांना एक नवी गोष्ट सांगायला तो आला.
"गुरुजी, आपण हे करून पहाच" गोष्ट सांगून झाल्यावर तो म्हणाला. गुरुजींचे कुतूहल चाळवले होते. त्यांनी त्याच दिवशी ती गोष्ट खरी की खोटी हे पाहिले. मग ते घरी आले आणि त्यांनी काय घडले ते आपल्या पत्नीला सांगितले.
"अग, माझ्या एका विद्यार्थ्याने सांगितले ते खरे आहे का ते मी आज प्रयोग करून पाहिले. मोठी गंमत आली. मी सार्वजनिक रथांत चढलो आणि पाठच्या बाजूला बसलो. रथाचा वाहक आला. मी माझे तिकिट काढले. थोड्या वेळाले मी उठलो आणि रिकाम्या असलेल्या दुस~या आसनावर जाऊन बसलो. वाहक परत माझ्याकडे आला आणि माझ्याकडे त्याने तिकिटाचे पैसे मागितले. मी त्याला माझे तिकिट दाखविले. ते बघून तो निघून गेला. जवळचे एक आसन रिकामे झाल्यावर मी उठलो आणि त्या आसनावर जाऊन बसलो. वाहक परत एकदा माझ्याकडे आला आणि माझ्याकडे त्याने परत एकदा तिकिटाचे पैसे मागितले. मी त्याला माझे तिकिट दाखविले. ते बघून तो निघून गेला. दोन थांब्यांचे अंतर गेल्यावर रथाच्या पुढच्या भागांत एक आसन रिकामे झाले. मी उठून तेथे जाऊन बसलो. अग काय सांगू, वाहक परत एकदा माझ्याकडे आला आणि माझ्याकडे त्याने परत एकदा तिकिटाचे पैसे मागितले. मी त्याला माझे तिकिट दाखविले आणि विचारले, की त्याने माझ्याकडे चार वेळा तिकिटाचे पैसे मागितले. दर वेळी मी आसन बदलले की तो माझ्याकडे तिकिट काढावे म्हणून येणार काय? तेव्हा तो तोंड पाडून निघून गेला."
"कमाल आहे. तो माणसांचे चेहरे बघतो की फक्त डोकी मोजतो?" गुरुजींच्या पत्नीने विचारले. "आणि तुम्हीसुद्धा या वयाला हा काय पोरकटपणा केलांत?"
"अग, पोरकटपणांतही एक मजा असते" गुरुजी खुशीत म्हणाले. शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी कधी पोरकटपणा केलाच नव्हता. त्यांना त्यांचे बालपण आठवले आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनाचा क्षणभर विसर पडला.

Thursday, August 20, 2015

रथ चालकांचे मानसशास्त्र

गुरुजी घरी आले आणि हात पाय धुवून जरा स्वस्थ बसले.
"काय हो, दमलात का?" त्यांच्या पत्नीने विचारले.
"दमण्यासारखे फारसे काम केलेले नाही." गुरुजी म्हणाले. "पण माणसांचे वर्तन पाहून मनाला मात्र त्रास होतो हे खरे."
"आज कोणी काय केले?" त्यांच्या पत्नीने विचारले. ज्या गोष्टींत इतर माणसांना काही अयोग्य वाटत नाही त्यांच्यामुळे आपल्या पतीला मनाला त्रास होतो हे तिला माहीत होते.
"आजचीच गोष्ट आहे असे नाही. रोजचीच आहे. सामान्य जनतेसाठी महाराजांनी भाड्याचे रथ ठेवले आहेत. या रथांचे काही चालक विचित्र वागतात. एका रथाचा चालक रथ रथांच्या थांब्यावर थांबवत नाही. तो नेहमी रथ थांब्याच्या बराच पुढे नेऊन थांबवतो. मग थांब्यावरची सगळी माणसे रथ पकडण्यासाठी जिवाच्या आकांताने धावतात. व्रुद्ध, गर्भवती स्त्रिया, कडेवर लहान मूल असण~या स्त्रिया यांना याचा खूप त्रास होतो."
"अहो, त्याला रथ चालवण्याचा पुरेसा अनुभव नसेल. थांबवताना त्याची चूक होत असेल" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"योग्य ठिकाणी रथ थांबवता येतो याची खात्री केल्याशिवाय कोणालाही रथ चालवण्याचा परवाना मिळत नाही" गुरुजी म्हणाले. "आपल्यापेक्षा सुखवस्तू असणा~या लोकांना त्रास दिला की त्याचे मनांतले दुःख हलके होत असणार. म्हणून तो असा वागत असणार. निळ्या कपड्यांतला निरिक्षक थांब्यावर असला की त्या चालकाचा रथ थांब्यावर अचूक थांबतो हे माझ्या लक्षांत आले आहे."
'अशा गोष्टींकडे लक्षच दिले नाही तर काय बिघडेल?' असे म्हणायची त्यांच्या पत्नीला इच्छा झाली, पण त्यांचे मन दुखावू नये म्हणून ती मूक राहिली.
"दुसरा एक चालक आहे, तो सर्व माणसे रथांत चढण्यापूर्वीच रथ चालू करतो. मग माणसे धडपडतात. काही जण पडतात. एक दिवस कोणीतरी रथाच्या चाकाखाली सापडून मरेल अशी मला भीती वाटते आहे."
"त्याच्या रथांत तुम्ही कधी चढू नका हो" गुरुजींची पत्नी म्हणाली. "एक रथ गेला तर पुढच्या रथाने जाता येईल. आपला जीव मोलाचा, त्याच्यापुढे जरासा उशीर झाला तर काही बिघडत नाही."
"हो तर" गुरुजी म्हणाले. "हा चालक माणसे रथांतून उतरण्यास विलंब करत असतील तर त्यांच्यावर मोठ्या आवाजांत ओरडतो. आजारी माणसे, व्रुद्ध, अपंग, अशा कोणालाही सोडत नाही. अशी माणसे काय जाणून बुजून हळूहळू उतरतात काय?"
"असतात काही माणसे विचित्र" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"तिसरा चालक जिथे एखादी तरुण स्त्री उभी असेल तिथे रथ थांबवतो. ती थांब्याच्या अलिकडे असेल तर अलिकडे, पलिकडे असेल तर पलिकडे. रांगेत उभ्या असणा~या माणसांनी रथांत प्रथम चढावे यापेक्षा त्याला आवडलेल्या स्त्रीने प्रथम चढावे असे त्याला वाटते असे दिसते."
"शी!" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"अशी माणसे रोज दिसतात म्हणून मनाला थकवा आलाय" गुरुजी म्हणाले.
गुरुजींना त्रास होतो याचे त्यांच्या पत्नीला वाईट वाट्ले खरे, पण आपला पती अशा विचित्र माणसांसारखा नाही ही गोष्ट जाणवून तिला आनंदही झाला.

Tuesday, August 18, 2015

ते करायला हवेच का?

राजवैद्य खेदाने डोके हलवत असताना गुरुजी तेथे पोहोचले.
"राजवैद्य, काय झाले म्हणून डोके हलवत आहात?" गुरुजींनी विचारले.
"अहो, काही काही रुग्ण असे काय प्रश्न विचारतात की काय उत्तर द्यावे ते समजत नाही. आत्ताच एक स्त्री आली होती. स्वतःला काय लक्षणे आहेत हे तिने सांगितल्यावर मी म्हटले, ठीक आहे, आपण तपासणी करूया. तर तिने मला विचारले की तपासून घ्यायला पाहिजेच काय?"
"अहो, तिला संकोच वाटला असेल" गुरुजी म्हणाले.
"ते बरोबर आहे हो. पण तपासल्याशिवाय तिला काय विकार आहे हे कसे कळणार? ते मी तिला समजावून सांगितले, तर तिने परत विचारले की तपासून घ्यायला पाहिजेच काय?"
"कमाल आहे" गुरुजी म्हणाले. "मग आपण काय सांगितलेत?"
"मी म्हटले, तपासून घेतले पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही. पण आपल्या आजारासाठी उपचार करून घेण्यासाठी आपण येथे स्वेच्छेने आला आहात. तपासून घेणे हे त्या क्रियेचा पुढचा भाग आहे. तो पार पडला नाही तर मला आपले उपचार करता येणार नाहीत. मग तिने तपासून घेतले. ते बरेच झाले. तिला गंभीर विकार होता. आता त्याचे उपचार सुरू झालेत. ती तशीच निघून गेली असती तर तिचे पुढे काय झाले असते त्याची कल्पना करवत नाही."
"तरी नशीब उपचार केलेच पाहिजेत का असे म्हणाली नाही" गुरुजी म्हणाले.
"अहो, तसे म्हणणा~या स्त्रियाही भेटतात. वाळूक झाले तर शस्त्रक्रियेशिवाय बरे होत नाही. तसे सांगितले की त्या विचारतात, शस्त्रक्रिया केलीच पाहिजे का?"
"मग आपण काय उत्तर देता?"
"मी म्हणतो, शस्त्रक्रिया केलीच पाहिजे असे काही नाही. आपण शस्त्रक्रियेशिवाय राहू शकता. पण ते वाळूक तुमच्या शरीरांत राहील आणि कालांतराने मोठे मोठे होत जाईल. मग त्या शस्त्रक्रिया करून घेतात."
"घाबरत असतील हो त्या" गुरुजी म्हणाले.
"ते खरे आहे. म्हणून तर आम्हाला समजुतीने घ्यावे लागते. रुग्णाचे मन सांभाळून औषधे आणि शस्त्रक्रिया यांचा वापर करावा लागतो" राजवैद्य म्हणाले.

Wednesday, July 29, 2015

राक्षसी खेळ

गुरुजींचा एक विद्यार्थी जरा वेगळा होता. त्याचे काय करायचे हे त्यांच्या लक्षांत येत नव्हते. शेवटी त्यांनी राजवैद्यांचा सल्ला मागितला.
"राजवैद्य, हा विद्यार्थी जरा वेगळा आहे. तो काय करतो? त्याला एखादे झुरळ सापडले, तर ते पकडतो. मग तो त्याचा एक एक पाय खेचून तोडतो. प्रत्येक पाय तोडल्यावर खुशीत हसतो. पाय संपले की त्याच्या मिशा एक एक करून तोडतो. अशा वेळी त्याचे तोंड पाहवत नाही."
"हा मुलगा जरा नाही, बराच वेगळा आहे" राजवैद्य गंभीरपणे म्हणाले. 'मोठा झाल्यावर तो मारामा~या, गुंडगिरी वगैरे करेल, मोठा खुनशी गुन्हेगार होईल असे वाटते."
"त्याला काही उपाय?" गुरुजींनी विचारले.
"मुलांच्या मानसोपचारतज्ज्ञाला दाखविले व वेळीच उपचार केले तर फायदा होण्याची शक्यता आहे."
"मोठेपणी असे झालेल्या रुग्णांना आपण पाहिले आहे का?" गुरुजींनी विचारले.
"हो तर. रुग्णच का, इतर अशी माणसेही पाहिली आहेत. आपल्या राजाच्या रुग्णालयांत एक अशा मनोव्रुत्तीचे वैद्य आहेत. हाताखालच्या शिकाऊ वैद्यांना, विद्यार्थ्यांना, कमजोर व्यक्तींना हे वैद्य अशाच प्रकारे छळतात."
"म्ह.. म्हणजे?" गुरुजी चाचरले.
"हात पाय तोडत नाहीत हो" राजवैद्य हसून म्हणाले. "घाबरू नका. बहुतेक वेळा मानसिक छळच करतात. पण पाठमो~या उभ्या असणा~या एका कुबड्या विद्यार्थिनीच्या कुबडाला त्यांनी एकदा पाठून येऊन हात लावला होता. तिचा तेव्हा झालेला चेहरा अजून आठवतोय" राजवैद्य विषण्णपणे म्हणाले.
"हं."
"त्यांच्या लहानपणी मानसोपचारतज्ज्ञ असते तर किती बरे झाले असते" गुरुजी म्हणाले.

Wednesday, July 8, 2015

तबकधारिणी

आटपाट नगरातल्या राजाच्या राजवैद्यांच्या कपाळावर आठी बघून मास्तर विचारात पडले. एखादा निदान करण्यास अवघड असा रुग्ण आला की एखाद्या रुग्णाची तब्येत अनपेक्षितपणे खालावली?
"वैद्यराज, सर्व काही क्षेम आहे ना?" गुरुजींनी विचारपूस केली.
"अं... ह..हो. तसे पाहिले तर सर्व काही क्षेम आहे" राजवैद्य उत्तरले.
"मग ही कपाळावरची आठी?"
आपल्या कपाळावर आठी दिसते आहे हे राजवैद्यांना तेव्हा कुठे समजले.
"अहो गुरुजी काय सांगू? आमचा तो राक्षस आहे ना..."
"राक्षस म्हणजे सर्वांना छळणारे ते सहवैद्य का?" गुरुजींनी विचारले.
"तेच ते. त्यांचे वर्तन आठवून कपाळावर आठी पडली. आज मी रुग्णांना तपासण्याच्या फेरीवर चाललो होतो, तेव्हा पाहिले, तर एक पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी वैद्य मुलगी शल्यक्रियाग्रुहाबाहेर अवघडून उभी होती. अंगावर शल्यक्रियाग्रुहात घालायचे हिरवे कपडे होते. दोन्ही हातांवर तिने हिरव्या कपड्यांची एक जोडी तबकांत धरावी तशी तोलून धरली होती. शल्यक्रियाग्रुहाचा सेवकसुद्धा असा कपडे धरून उभा रहात नाही. मी तिला विचारले की ती अशी का उभी आहे, तेव्हा पत्ता लागला की राक्षस समोर विश्रामकक्षांत बसला होता आणि तो बाहेर आला की त्याला ते कपडे देण्यासाठी ती तेथे उभी होती."
"राक्षसाचे वर्तन राजेशाही दिसते" गुरुजी म्हणाले.
"अहो, महाराजांना एक वेळ जे शोभेल तसे वर्तन राक्षसाला कसे शोभेल? मी स्वतः राजवैद्य असून मी सर्व आयुष्यांत असा कधी वागलो नाही."
"मग तुम्ही काय केलेत?" गुरुजींनी विचारले.
"ते कपडे त्यांना दे आणि शल्यक्रियाग्रुहांत जा असे मी तिला सुचवले" राजवैद्य म्हणाले. "पण ती हसली आणि नको असे म्हणाली."
"शेजारच्या भोजनकक्षांतले एक जेवणाचे ताट तिला द्यायचे होतेत" गुरुजी म्हणाले "त्यांत कपडे ठेवून उभी राहिली असती तर तबकांत ठेवल्यासारखे वाटले असते."
राजवैद्य हंसले.

Sunday, July 5, 2015

ठसा

आटपाटनगरीतल्या अनेक माणसांना एक गमतीदार सवय होती. दिसलेल्या, ऐकू आलेल्या, किंवा वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपला स्वतःचा ठसा असलाच पाहिजे असा त्यांचा समज होता, आणि त्याप्रमाणे ते वर्तन करत असत.
माझे बाबा सहा फूट उंच आहेत, असे लहानपणी वर्गमित्राने अभिमानाने सांगितले, की ऐकणा~याचे बाबा सहा फूट एक इंच उंच हमखास निघायचे.
चेंडू्फळीच्या खेळात देशाच्या कप्तानाचा त्रिफळा उडालेला दूरदर्शनवर पाहिला, की गल्लीतही चेंडू्फळी खेळता न येणारा माणूस लगेच म्हणायचा, "फळी सरळ ठेवून खेळला असता तर असे झाले नसते".
देशाच्या पंतप्रधानांनी शेजारच्या देशाच्या पंतप्रधानांबरोबर हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र वर्तमानपत्रात पाहिले, की माणूस लगेच उद्गारायचा, "अरे, आगीबरोबर खेळू नये, येव्हढेपण कळत नाही?"
"आज काय गंमत झाली माहिती आहे?" असे म्हणून कोणी एखादी गमतीदार घटना सांगायला सुरुवात केली की त्याचे वाक्य मध्येच तोडून "आमच्या कार्यालयात पण काय घडले सांगू?" असे म्हणून ऐकणारा आपली गंमत सांगायचा.
शहरातल्या रस्त्यांवर आपापले ठसे म्हणून नागरीक आवडीप्रमाणे थुंकत, पानाच्या पिचका~या मारत, लघुशंका करत, प्रातर्विधी करत, आणि कचरा टाकत.
सार्वजनिक बसने जाताना विद्यार्थी पु्ढच्या आसनाच्या पाठच्या बाजूवर स्वतःचे नाव चाकूच्या पात्याच्या टोकाने कोरत किंवा न पुसल्या जाणा~या रंगाने लिहित. हेच विद्यार्थी शाळेच्या बाकड्यावरही हाच प्रयोग करत. पुढे प्रेमात पडले की त्या मुलीचे नाव आपल्या नावाबरोबर अशाच पद्धतीने लिहित. पुढेमागे पैसे असले तर प्रसिद्ध स्थळांना भेट देऊन त्या राष्ट्रीय ठेव्यांच्या भिंतींवरही हाच प्रयोग करत. तेव्हढे पैसे गाठीला नसले, तर गावाबाहेर वनभोजनाला जाऊन तिथल्या झाडांच्या बुंध्यांवर आपापली नावे कोरत.
जेव्हा इंटरनेटचा शोध लागला तेव्हा या सवयीचा नवा अविष्कार बघायला मिळू लागला. फेसबूकच्या दुस~याच्या भिंतीवर जाऊन त्यांच्या लिखाणावर ते आपापले शेरे लिहू लागले. त्यांचे ट्वीट आपल्या नावावर पुनः ट्वीट करू लागले. एखाद्या विचारवंताच्या लेखाचे विडंबन करून आपल्या नावावर प्रसिद्ध करू लागले. प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर खोटी खाती उघडून नाहीनाही तो मजकूर त्यांच्या नावावर प्रसिद्ध करू लागले. थोड्याशा लोकांना हॅकिंग करता यायचे ते मोठमोठ्या संकेतस्थळांना विद्रूप करू लागले.
स्वतःच्या कर्तुत्वावर आपले स्वतःचे असे काही निर्माण करण्यापेक्षा इतरांच्या निर्मितीवर आपला अनैतिक ठसा मारणे अनेक पटीने सोपे असते, हे सत्य त्या काळी लोकांना कसे उमजले कोण जाणे.

Friday, July 3, 2015

ब्रुहन्नडा

रविवार असल्यामुळे आटपाट नगर सुस्त होते. दुपारची जेवणे उशीरा झाली. गुरुजींना राजवैद्यांकडे चहासाठी बोलावले होते. गुरुजी आणि त्यांची भार्या सायंकाळी पाच वाजता राजवैद्यांकडे पोहोचले. चहापान झाल्यावर दोघांच्या भार्या बागेतली नव्याने लावलेली फुलझाडे बघण्यासाठी रवाना झाल्या. राजवैद्य आणि गुरुजी गप्पा मारायला बसले.
"काय वैद्यराज, काय खबरबात?" गुरुजींनी विचारणा केली. राजवैद्यांकडे नेहमी काहीतरी नवीन ऐकायला मिळायचे.
"अहो, तुमचा विश्वास बसणार नाही. महाभारतात होती तशी ब्रुहन्नडा आमच्याकडे पण घडली."
"हं?" गुरुजी म्हणाले.
"हे बघा, आमच्या रुग्णालयांत महासेन नावाचा तरुण, हुशार, उमदा वैद्य महाराजांनी सहवैद्य या पदावर नियुक्त केला. काही महिने त्याने व्यवस्थित काम केले. मग त्याने रजेची मागणी केली."
"हं."
"पण त्याचे रजेचे कारण काही वेगळेच होते. त्याला वंगदेशात जाऊन स्वतःवर शल्यक्रिया करून घेऊन पुरुषाची स्त्री व्हायचे होते."
"असे करता येते?"
"कठीण असते, पण ते शक्य आहे."
"पण का?"
"त्याच्या मते तो एका पुरुषाच्या शरीरात अडकलेली एक स्त्री होता. परमेश्वराची ती चूक त्याला दुरुस्त करून हवी होती."
"परमेश्वराची चूक?" गुरुजींच्या काही लक्षांत येईना. "बरे पण त्याच्या आईवडिलांची या गोष्टीला सम्मती होती?"
"छे हो! पण आजकालची मुले आईवडिलांचे आणि मोठ्या माणसांचे ऐकतात कोठे?"
"पण वंगदेशांत का? आपल्याकडे देशोविदेशीचे रुग्ण येत असतात, आणि या मुलाला बाहेर जावे लागावे?"
"आपल्या मानसोपचारतज्ञांनी त्याला मानसिकद्रुष्ट्या स्त्री आहे असे प्रमाणित करण्यास नकार दिला. मग त्याने ते प्रमाणपत्र आणि शल्यक्रिया वंगदेशात करायचे ठरवले."
"...." गुरुजींना बोलण्यासारखे काही सुचले नाही.
"त्याने शल्यक्रियेपूर्वी स्त्री संप्रेरके घेतली होती. अहो काय सांगू, जेव्हा मला या सर्व गोष्टींची कल्पना नव्हती तेव्हा एका रुग्णाच्या उपचारांच्या वेळी त्याचा माझ्या हाताला स्पर्श झाला, आणि परस्त्रीचा स्पर्श झाल्यासारखा मी शहारलो."
राजवैद्यांचा चेहरा बघून त्यांच्या बोलण्यांत जराही अतिशयोक्ती नव्हती हे गुरुजींच्या लक्षांत आले.
"कालच तो शल्याक्रियेतून बरा होऊन कामावर रुजू झाला. आजपासून मला महासेन न म्हणता महानंदा म्हणायचे असे त्याने सांगितले आहे. त्याच्या पगारपत्रकावरही तेच नाव यावे असे तो म्हणतो, पण ते येवढ्यात होणे कठीण दिसते."
"पण तो आता स्त्रीसारखा दिसतो का?" गुरुजींनी विचारले.
"सलवार कमीज घालून आला होता. हातात एक बांगडी होती. गळ्यात एक माळ होती. कानांत डूल होते."
"आणि स्त्रीसुलभ वर्तन?" गुरुजींनी विचारले.
"मुली कानावरचे केस हाताने कानामागे करतात तसे तो मधूनमधून करत होता. आणि एका शिकाऊ वैद्याने कामांत काही चूक केली, तेव्हा तो चिडून म्हणाला, 'नीट काम कर, नाहीतर मी तुला कसे नाचवून ठेवते बघ."
"आता पुढे काय होणार?"
"तो नोकरी सोडून कोठेतरी जाणार आहे. पण इतर समस्या आहेतच. कलिंगातून एका ग्रुहस्थाची तक्रार आली आहे. या वैद्याने त्या ग्रुहस्थाच्या मुलाला आपल्याबरोबर रहाण्यासाठी सळो की पळो करून टाकले आहे. पत्रे पाठवणे, संदेश पाठवणे, दूरध्वनी करत राहाणे... तो आमच्या रुग्णालयांत असेच वर्तन करतो का ते त्या ग्रुहस्थाने माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत विचारले आहे."
गुरुजींनी कपाळाला हात लावला.

Tuesday, June 23, 2015

राक्षस

आटपाट नगरांतली गोष्ट आहे. गुरुजी फिरायला म्हणून बाहेर पडले होते. समोरून राजवैद्य येतांना दिसले. त्यांची भ्रुकुटी जरा वक्र दिसली म्हणून गुरुजींनी त्यांना थांबवले आणि विचारले,
"वैद्यराज, आपण जरा त्रासलेले दिसता. सर्व काही क्षेम आहे ना?"
"अहो गुरुजी काय सांगू? मला स्वतःला काही त्रास नाही. पण तो राक्षस आहे ना, त्याचे वर्तन पाहून मन विषण्ण होते हो."
"राक्षस? मी समजलो नाही" गुरुजी म्हणाले. प्रभू रामचंद्रांनी राक्षसांचा नायनाट करून तपे उलटली होती. आता नव्याने राक्षस कोठून आला हे त्यांच्या ध्यानांत आले नाही.
"अहो, आमचे एक सहवैद्य. त्यांनी एका प्रशिक्षणार्थी वैद्य मुलीला नको जीव करून टाकले आहे."
"काय करतात तरी ते काय असे?"
"अहो, मुलांची जात. शिकतांना चुका करायचीच. चुकले तर समजावून सांगायचे. तरी समजले नाहीत तर ओरडायचे. अती झाले तर शिक्षा म्हणून त्यांची शल्यक्रिया करण्याची पाळी येईल तेव्हा त्यांना त्या संधीपासून वंचित ठेवायचे. पण त्यांचा छळ नसतो हो करायचा या राक्षसासारखा."
"काय केले तरी काय त्यांनी?" गुरुजींनी भीत भीत विचारले. मुलीला त्याने काय केले असेल अशा विचाराने त्यांच्या मनाला कापरे भरले.
"अहो, त्या दिवशी मी रुग्णांना तपासण्याच्या फेरीवर होतो तेव्हा पाहिले. ही मुलगी रुग्णकक्षाबाहेर रुग्णांसाठी प्रसाधनग्रुह आहे त्याच्या दारांत उभी होती. चेहेरा रडकुंडीला आलेला होता. कक्षांत गेलो तर राक्षस इतर प्रशिक्षणार्थी वैद्य आणि कनिष्ठ वैद्य यांच्याबरोबर रुग्ण तपासत होता. मग समजले की तिला शिक्षा म्हणून बाहेर उभे केले होते."
"प्रसाधनग्रुहाबाहेर उभे?" गुरुजींना शरमल्यासारखे वाटले. येव्हढ्या शिकलेल्या मुलीला सर्वांसमोर असे लज्जित केल्यामुळे तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल या कल्पनेने त्यांना कसनुसे झाले.
"मी कक्षाबाहेर आलो आणि तिला म्हटले, बाळ, अशी उभी राहू नकोस. या आसनावर बस. ती म्हणाली, नको वैद्यराज, मी उभीच रहाते" राजवैद्य म्हणाले.
"हं ..." गुरुजींना बोलण्यासारखे काही सुचले नाही.
"आज तर कहरच झाला. राक्षस स्वतःच्या सर्व प्रशिक्षणार्थींना घेऊन मेजवानीला गेला. कार्यकाळात जाण्याची गरज नव्हती, तरी पण गेला. पण या मुलीला नेले नाही."
"तिचा उपास वगैरे असेल" गुरुजी पुटपुटले. पण त्यांना मनांतून खात्री वाटत होती की तिचा उपास नसणार.
"छे हो! हल्लीची मुले उपास करतात काय? ती सामान्य सभेला आली तेव्हा मी तिला विचारले, की तू मेजवानीला गेली नाहीस काय?. आपण काहीतरी खाऊन घेतले आहे, असे ती म्हणाली."
"प्रशिक्षणार्थी हे आपल्या मुलांसारखे असतात. त्यांच्यात असा दुजाभाव दाखवणे बरे नाही" गुरुजी म्हणाले.
"माझेही तेच मत आहे. अहो, काय सांगू? ती मुलगी एरवी कष्टी असते. आज राक्षस नव्हता तर ती चक्क स्मितहास्य करत होती" राजवैद्य म्हणाले.
"आता मला समजले आपण त्या वैद्यांना राक्षस का म्हणता ते" गुरुजी म्हणाले. "पण राजाकडे कोणी तक्रार घेऊन का जात नाही?"
"सर्व जण भितात हो. परिक्षेत अनु्त्तीर्ण केले तर, असे त्यांना वाटते. मांजराच्या गळ्यांत घंटा बांधणार कोण?"
"पण एक दिवस एखा्दी हळव्या मनाची मुलगी जीव देईल हो" गुरुजी म्हणाले.
"त्या चिंतेनेच तर मी पोखरला जातोय" राजवैद्य म्हणाले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क